मुंबई

Mumbai : टीम इंडियाच्या T२० विजयाने मुंबई दणाणली! शिवाजी पार्क ते मरीन ड्राइव्हवर चाहत्यांचा जल्लोष

भारताच्या T२० विश्वचषक विजयाचा आनंद मुंबईत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शिवाजी पार्क, मरीन ड्राइव्ह आणि विमानतळ परिसरात मोठ्या संख्येने चाहत्यांनी तिरंगा फडकावत, नाचत-गात आणि फटाके फोडत टीम इंडियाच्या ऐतिहासिक विजयाचा जल्लोष केला.

Mayuri Gawade

अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात भारताने न्यूझीलंडचा पराभव करत सलग दुसऱ्यांदा ICC पुरुष टी२० विश्वचषक जिंकला. या ऐतिहासिक विजयाची बातमी समोर येताच मुंबईत सर्वत्र उत्सवाचे वातावरण निर्माण झाले. क्रिकेटप्रेमी रस्त्यावर उतरले, तिरंगा फडकवत आणि फटाके फोडत भारताच्या सलग दुसऱ्या टी२० विश्वचषक विजयाचा आनंद साजरा केला.

शिवाजी पार्कमध्ये मोठी गर्दी

सोशल मीडियावर जल्लोषाचे अनेक व्हिडिओ समोर आले. शहरातील अनेक ठिकाणी चाहत्यांची मोठी गर्दी दिसून आली. क्रिकेटप्रेमींसाठी खास मानल्या जाणाऱ्या शिवाजी पार्क येथे शेकडो चाहते जमले होते. त्यांनी घोषणाबाजी केली, तिरंगा फडकवला आणि नाचत भारताच्या विजयाचा उत्साह व्यक्त केला.

मरीन ड्राइव्हवर उत्साहाचे वातावरण

मरीन ड्राइव्हवरही उशिरापर्यंत जल्लोष सुरू होता. टीम इंडियाची जर्सी घातलेले अनेक तरुण-तरुणी आणि कुटुंबे येथे जमले होते. गाणी, नृत्य आणि फटाक्यांच्या रोषणाईत संपूर्ण परिसरात उत्साह दिसत होता. अनेकांनी एकत्र येऊन हा अभिमानाचा क्षण साजरा केला.

विमानतळ परिसरातही जल्लोष

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या परिसरातही चाहत्यांची गर्दी झाली. विजयाची बातमी पसरताच रस्त्यावर नाचत उत्सव साजरा केला गेला. हातात तिरंगा घेऊन घोषणाबाजी करत चाहत्यांनी टीम इंडियाला शुभेच्छा दिल्या.

चाहत्यांच्या भावना

या जल्लोषात सहभागी झालेल्या एका क्रिकेटप्रेमीने सांगितले की, भारताच्या टी२० विश्वचषक विजयामुळे अत्यंत आनंद आणि अभिमान वाटत आहे. हा क्षण देशातील प्रत्येक क्रिकेटप्रेमीसाठी अविस्मरणीय आहे. आणखी एका चाहत्याने या विजयाला "आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त देशासाठी मिळालेली खास भेट" असे संबोधत भारताच्या कामगिरीचा अभिमान व्यक्त केला.

भारताचा दणदणीत विजय

अंतिम सामन्यात भारताने फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही विभागांत दमदार कामगिरी केली. संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा यांच्या फलंदाजीच्या जोरावर भारताने ५ बाद २५५ धावा केल्या. न्यूझीलंडसमोर २५६ धावांचे लक्ष्य ठेवले असताना, न्यूझीलंडचा संघ १९ षटकांत १५९ धावांवर सर्वबाद झाला. त्यामुळे भारताने हा सामना ९६ धावांनी जिंकत टी२० विश्वचषकावर नाव कोरले.

Mumbai : महापौरांचा पती असल्याचे सांगत शिक्षकाच्या फोटोचा गैरवापर; बदनामीकारक यूट्यूब व्हिडीओप्रकरणी FIR दाखल

Mumbai : चेंबूरमध्ये धक्कादायक प्रकार! चारित्र्यावर संशय घेत गर्भवती प्रेयसीचा काढला काटा; प्रियकराला अटक

Video : चुकून लेडीज डब्यात चढला; धावत्या लोकलमधून उडी मारणार इतक्यात...

Navi Mumbai : रबाळे एमआयडीसीतील कंपनीला भीषण आग; परिसरात धुराचे लोट, Video

शक्तिपीठ महामार्गासाठी भूसंपादनाला मिळाली गती; शेतकऱ्यांचा विश्वास जिंकण्यासाठी कार्यशाळांचे आयोजन