मुंबई : विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या दरम्यान विधान भवनातील अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी विधान भवन प्रशासनाने चेहरा पडताळणीचा नियम लागू केला आहे. मात्र, सोमवारी पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी नव्या प्रवेश नियमांतील तांत्रिक त्रुटींमुळे गोंधळाची परिस्थिती उद्भवली. त्यामुळे पहिल्या दिवशी या नियमावलीला स्थगिती देण्यात येत असल्याची घोषणा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना सभागृहात करावी लागली.
विधान भवनात प्रवेशासाठी फेस रिकग्निशन प्रणालीद्वारे प्रवेश दिला जाईल, असा निर्णय विधिमंडळाने घेतला आहे. त्यासाठी ई-मेलद्वारे संबंधितांची माहिती मागवण्यात आली होती. अनेकांनी सूचनेप्रमाणे रकान्यात माहिती भरून पाठवूनही त्याचा उपयोग झाला नाही. माध्यमांच्या प्रतिनिधींनी शनिवारी आणि रविवारी या प्रणालीसाठी नोंदणी केली. परंतु, अनेकांची नोंदणीच न झाल्याने गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. अखेर गर्दी टाळण्यासाठी पत्रकार, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना ओळखपत्राने प्रवेश देण्यात आला.