मुंबई : वरुणराजाची कृपादृष्टी न झाल्याने मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांतील पाणीसाठ्यात घट झाली आहे. २१ जून रोजी धरणात फक्त ८.६८ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे मंगळवार, २३ जूनपासून राखीव पाणीसाठ्यातून मुंबईला पाणीपुरवठा करण्यात येणार आहे.
जून महिन्याच्या ७ तारखेला पावसाचे आगमन होते, असा अंदाज आहे. मात्र आता जून महिन्याचे २१ दिवस झाले तरी पावसाची ओढ कायम आहे. सातही धरणातील पाण्याची पातळीने तळ गाठल्याने मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणात २१ जून रोजी सकाळी ६ वाजेपर्यंत ८.६८ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. राज्य सरकारने अप्पर वैतरणा धरणातील ९३ हजार ५०० तर भातसा धरणातील १ लाख ३७ हजार मिलियन लिटर राखीव पाणीसाठा उपलब्ध केला असून सात धरणातील व राखीव पाणीसाठा जुलै मध्यापर्यंत मुंबईची तहान भागवेल इतका आहे. धरणातील पाणीसाठ्यात घट होत असल्याने अखेर राखीव पाणीसाठा वापरण्याची वेळ मुंबई महापालिकेवर आली आहे. येत्या मंगळवारपासून राखीव पाणीसाठ्याचा वापर सुरु करणार असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.
मोडक सागर, भातसा, अप्पर वैतरणा, मध्य वैतरणा, विहार, तुळशी व तानसा या सात धरणांतून मुंबईकरांची तहान भागवण्यासाठी रोज ४,१०० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करण्यात येतो. तर वर्षभराची तहान भागवण्यासाठी धरणांत १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर पाणी साठ्याची गरज भासते. सध्या सातही धरणात १ लाख २५ हजार ५२५ दशलक्ष लिटर पाणी साठा उपलब्ध आहे. १५ मे पासून १० टक्के पाणी कपात लागू करण्यात आली आहे. मात्र एल नीनोचा प्रभाव असल्याने यंदा पाऊस किती व कधी पडेल याचा अंदाज नाही. त्यामुळे भविष्यातील पिण्याच्या पाण्याचे नियोजन म्हणून पाणी कपातीत १ जुलैपासून आणखी १० टक्के अशी २० टक्के पाणी कपात लागू करण्यात येणार असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.
२१ जून रोजी पाणीसाठा
(दशलक्ष लिटर)
अप्पर वैतरणा - ०
मोडक सागर - ३०,६८१
तानसा - ४,४१२
मध्य वैतरणा - २०,००८
भातसा - ५८,२८८
विहार - ११,४२५
तुळशी - १,७७२