मुंबई : महाराष्ट्र राज्य आंबा उत्पादक संघाच्या वतीने (एमएसएमजीए) गुरुवार दि. १३ ऑगस्ट २०२६ रोजी कृषी, फलोत्पादन, सिंचन, प्रक्रिया, बियाणे, पचन, दुग्धविकास, पशुसंवर्धन परिषद व सिद्धेश्वर ॲग्रोटेक प्रदर्शनाचे आयोजन केले आहे.
हा कार्यक्रम राष्ट्रीय शेअर बाजार (एनएसई), बीकेसी वांद्रे (पूर्व)येथे सकाळी १० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत संपन्न होणार असल्याची माहिती कार्यक्रमाचे मुख्य संयोजक व महाराष्ट्र राज्य आंबा उत्पादक संघाचे (एमएसएमजीए) अध्यक्ष चंद्रकांत मोकल यांनी दिली.
मागील ५-६ वर्षे जागतिक हवामान बदलाचा परिणाम आंबा, भाजीपाला, फळे, कडधान्य व सर्व प्रकारच्या फलोत्पादनावर होत आहे. परिणामी कृषी, फलोत्पादनातील शेतकऱ्यांचे उत्पादन ६० टक्के घटून ते ४० टक्क्यावर आले आहे. उत्पन्न घटल्यामुळे शेतकरी बांधव अडचणीत आले आहेत.
या जिव्हाळ्याच्या समस्यांवर विचार विनिमय करून त्यांच्या सोडवणुकीसाठी प्रयत्न करणे, निर्यातक्षम व ऑरगॅनिक (सेंद्रिय) उत्पादनावर भर देणे, एपीएमसी व्यतिरिक्त पर्यायी बाजारपेठ उदा. विक्री केंद्र उभारणे, शासनामार्फत शेतकऱ्यांना नवनवीन बाजारपेठ उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न करणे, शेतकऱ्यांना काढणीपूर्व व काढणीपश्चात तंत्रज्ञानाची माहिती देणे. याबरोबरच शासनाच्या विविध योजनांची माहिती शेतकऱ्यांना देणे व या योजनांचा लाभ देणे हा परिषदेचा मुख्य उद्देश आहे.
यावेळी आयोजित प्रदर्शनात राष्ट्रीयकृत बँकांच्या योजनांची माहिती तसेच कृषी, फलोत्पादन, प्रक्रिया, पॅकहाउस आदींसाठी कर्ज प्रक्रिया सुलभ होण्याच्या दृष्टीने मार्गदर्शन करण्यात येईल.
या कार्यक्रमास राष्ट्रीय शेअर बाजार (एनएसई) चे मुख्य अर्थतज्ञ तिर्थकार पटनाईक, सिडबीचे महाव्यवस्थापक कुमार अंशुमान तसेच विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
उत्पादक कंपन्यांना गौरवणार
यावेळी कृषी, फलोत्पादन, सिंचन, प्रक्रिया, दुग्धविकास, पशुसंवर्धन आदि क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या शेतकऱ्यांना, शेतकरी गट व शेतकरी उत्पादक कंपन्यांना (एफपीओ/एफपीसी) यांना सन्मानित करण्यात येणार आहे.