मुंबई : मुंबईतील वाहतूककोंडी आणि वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेने शहरातील अपघातप्रवण ट्रॅफिक जंक्शन अर्थात ‘ब्लॅक स्पॉट’ सुरक्षित करण्यासाठी पुन्हा एकदा निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. विशेषतः पादचारी, सायकलस्वार आणि वाहनचालकांच्या सुरक्षेसाठी महत्त्वाच्या चौकांमध्ये विविध पायाभूत सुधारणा करण्यात येणार आहेत. या कामांसाठी सुमारे २२.१६ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.
मुंबईत पूर्वी ५९ ब्लॅक स्पॉट ओळखण्यात आले होते. त्यापैकी काही चौकांवर चार वर्षांपूर्वी ग्लोबल रोड सेफ्टीसाठी ब्लूमबर्ग परोपकार संस्थेच्या तांत्रिक सहाय्याने सुधारणा करण्यात आल्या होत्या. मात्र अद्याप ४८ चौक अपघाताच्या दृष्टीने धोकादायक मानले जात असून, त्यातील २० चौकांवर सर्वाधिक मृत्यू, गंभीर जखमी आणि अपघातांची नोंद झाली आहे. त्यामुळे या चौकांच्या पुनर्रचनेला प्राधान्य देण्यात आले आहे.
या अंतर्गत पादचाऱ्यांसाठी फुटपाथ रूंद करणे, रस्ता ओलांडण्याचे अंतर कमी करणे, वाहनांचा वेग नियंत्रित करण्यासाठी बॅरिअर व लेनची निर्मिती करणे तसेच डिव्हायडरवर थर्मोप्लास्टिक पेंटिंग करणे अशी विविध कामे हाती घेतली जाणार आहेत. काही ठिकाणी वाहनांची दृश्यता कमी असणे, सूचना फलकांचा अभाव आणि अव्यवस्थित वाहतूक यामुळे वारंवार अपघात होत असल्याचे पालिकेने नमूद केले आहे. यापूर्वी वाहतूककोंडीमुळे आणि ट्रॅफिक विभागाकडून परवानगी मिळण्यात अडचणी येत असल्याने ही कामे रखडली होती.
प्रमुख अपघातप्रवण जंक्शन
साकीनाका जंक्शन - एल विभाग
अमर महल जंक्शन, चेंबूर - एम पश्चिम विभाग
वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे, जोगेश्वरी
इस्टर्न एक्स्प्रेस हायवे, विक्रोळी
२२ कोटींचा खर्च