मुंबई : मुंबईसहा संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या वरळी येथील हिट अण्ड रन प्रकरणातील मुख्य आरोपी आणि माजी शिवसेना (शिंदे गट) नेते राजेश शहा यांचा मुलगा मिहीर याच्यासह त्याच्या चालकावर सदोष मनुष्यवधाचा खटला चालवण्यात येणार आहे. सत्र न्यायालयाचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश अनिल साळुंखे यांनी या दोघांवर बुधवारी सदोष मनुष्यवधाचा आरोप निश्चित केला, तर राजेश शहा यांची या खतल्यातून दोषमुक्त करण्याची विनंती फेटाळून लावत त्याच्या विरोधात पुरावे नष्ट केल्याचा आरोपनिश्चित केला.
दोन वर्षांपूर्वी मिहीरने ७ जुलै २०२४ रोजी पहाटे दारूच्या नशेत बेदरकारपणे बीएमडब्ल्यू कार चालवली आणि वरळी परिसरात नाखवा दाम्पत्याला जोरदार धडक दिली. या धडकेत दुचाकीस्वार प्रदीप नाखवा आणि त्यांची पत्नी कावेरी खाली पडले आणि त्यांना दुखापत झाली. मिहीर याने त्या दोघांना रुग्णालयात नेण्याऐवजी कावेरी यांना दीड किलोमीटरपर्यंत फरफरट नेले. त्यामुळे कावेरी यांना गंभीर दुखापत होऊन त्यात त्यांचा मृत्यू झाला. घटनेनंतर फरार झालेल्या मिहीरला ९ जुलैला विरारच्या रिसॉर्टमधून पोलिसांनी अटक केली होती.
वडिलांवर पुरावे नष्ट केल्याचा आरोप
मुख्य आरोपी मिहीर शहा हा दारूच्या नशेत होता याची पूर्ण कल्पना वडील राजेश शहा यांना होती, असा दावा सरकारी पक्षाने केला. गुन्हा घडल्याचे माहीत असूनही राजेश शहा यांनी मिहीरला वैद्यकीय तपासणी आणि अटकेपासून वाचवण्यासाठी जाणीवपूर्वक मदत केली आणि पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला.