एफपीजे न्यूज सर्व्हिस/मुंबई
पासपोर्ट आणि पोलीस क्लिअरन्स सर्टिफिकेट (पीसीसी) मिळण्यासाठी होणाऱ्या विलंबामुळे त्रस्त असलेल्या हजारो मुंबईकरांसाठी एक मोठा दिलासा देणारी बातमी आहे. प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयाने (आरपीओ) आता ज्यांचे अर्ज ४५ दिवसांपेक्षा जास्त काळापासून प्रलंबित आहेत अशा अर्जासाठी थेट 'वॉक-इन' सुविधा सुरू करण्याची घोषणा केली आहे. २ जुलैपासून हे अर्जदार ऑनलाइन अपॉइंटमेंटची प्रतीक्षा न करता थेट कार्यालयात जाऊन आपल्या समस्या सोडवू शकतील.
वांद्रे-कुर्ला संकुलातील (बीकेसी) विदेश भवनने गुरुवारी जारी केलेल्या अधिकृत सूचनेनुसार, ही विशेष वॉक-इन डेस्क सुविधा दर बुधवारी वगळता आठवड्यातील सर्व कामकाजाच्या दिवशी सुरू राहील. अर्जदारांना सकाळी ९ ते ११ या वेळेतच कार्यालयात उपस्थित राहणे बंधनकारक आहे. ४५ दिवसांपेक्षा अधिक काळ प्रलंबित अर्ज असलेले नागरिक कोणत्याही पूर्वपरवानगीशिवाय ऑनलाइन अपॉइंटमेंटशिवाय या किंवा सुविधेचा लाभ घेऊ शकतात.
गेल्या काही काळापासून वाढलेल्या अर्जाच्या प्रलंबित फाईल्समुळे अनेक नागरिकांचे परदेश प्रवासाचे बेत खोळंबले होते. पासपोर्ट कार्यालयाच्या या प्रशासकीय निर्णयामुळे मोठा बॅकलॉग कमी होण्यास आणि नागरिकांची गैरसोय दूर होण्यास मदत होणार आहे.
ऑनलाइन अपॉईंटमेंट घेतलेल्यांचे काय ?
ज्या मुंबईकरांनी आधीच भविष्यातील तारीख घेऊन ऑनलाइन अपॉईंटमेंट बुक केली आहे, त्यांनाही या निर्णयाचा फायदा घेता येईल. जर त्यांच्या अर्जाला ४५ दिवस उलटले असतील, तर ते अपॉईंटमेंटच्या तारखेची वाट न पाहता, या वॉक-इन सुविधेचा वापर करून आपला अर्ज लवकर मंजूर करून घेऊ शकतात.
कोणाला थेट प्रवेश
केवळ प्रलंबित अर्जच नव्हे, तर विशिष्ट श्रेणीतील अर्जदारांनाही तातडीने वॉक-इनची सुविधा देण्यात आली आहे. यामध्ये राजदूत आणि अधिकृत पासपोर्टधारक किंवा अर्जदार, परत आलेले पासपोर्ट किंवा पीसीसी पुन्हा पाठवण्यासाठी विनंती करणारे अर्जदार, परदेशी नागरिकत्व स्वीकारल्यानंतर भारतीय पासपोर्ट सरेंडर करू इच्छिणारे व्यक्ती, प्रलंबित पासपोर्ट फाईल अधिकृतपणे बंद करण्यासाठी अर्ज करणारे नागरिक यांचा समावेश आहे.