मुंबई : रेल्वे स्थानकावरील खाद्य पदार्थांचे स्टॉल वेळी-अवेळी प्रवास करणाऱ्या प्रवाशांची भूक भागवतात. हॉटेल किंवा फेरीवाल्यांपेक्षा त्यांचे दर निश्चित कमी असतात. त्यामुळे कमी खर्चात सर्वसामान्यांना आपले पोट भरता येते. आता १ जूनपासून रेल्वेवरील खाद्य स्टॉलवरील पदार्थही महाग होणार आहेत. त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांच्या खिशाला मोठा फटका बसणार आहे.
मध्य रेल्वे स्थानकांवरील स्टॉल्सवर मिळणारे खाद्यपदार्थ आणि पेये १ जूनपासून महाग होणार आहेत. सध्या १३ रुपयांना मिळणाऱ्या वडापावची किंमत २० रुपये होणार आहे, तर समोसा १२ वरून २० रुपये होणार आहे.
रेल्वे प्रशासन काही खाद्यपदार्थांच्या परिमाणात बदल करण्याचाही विचार करत आहे. संत्री, मोसंबी आणि सफरचंद यांसारख्या फळांच्या रसांच्या (ज्यूस) किमतींमध्येही सुधारणा करण्यात आली आहे. मात्र, सोडा उत्पादनांच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
पश्चिम रेल्वेने २०२५ मध्ये स्थानकांवरील स्टॉल्सवरील खाद्यपदार्थ आणि पेयांचे दर सुधारित केले होते, त्यापूर्वी २०२१ मध्ये शेवटची दरवाढ करण्यात आली होती. याच धर्तीवर आता मध्य रेल्वेनेही नवीन दरवाढ लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. या सुधारित मेनूमध्ये ड्रिंक्स, क्रीम डोनट्स, सूप, डोसा आणि नूडल्स यांसारख्या अनेक नवीन खाद्यपदार्थांचाही समावेश असेल.
केटरिंग असोसिएशनशी संबंधित एका पदाधिकाऱ्याने आरोप केला की, पूर्वी पश्चिम रेल्वेने आणि आता मध्य रेल्वेने ब्रँडेड कंपन्यांना फायदा पोहोचवण्यासाठी मिल्कशेक, चणे, शेंगदाणे आणि चिक्की यांसारख्या स्थानिक सुट्या खाद्यपदार्थांच्या विक्रीवर निर्बंध लादले आहेत. त्यांनी असा दावा केला की, ब्रँडेड उत्पादने स्थानिक पातळीवर विकल्या जाणाऱ्या सुट्या वस्तूंपेक्षा दोन ते तीन पटीने महाग असतात. तर पॅकबंद ब्रँडेड वस्तूंच्या परिमाणावर आणि गुणवत्तेवर अनेकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाते. तरीही रेल्वे प्रशासनाने अधिकृत पत्रांद्वारे ब्रँडेड पॅकेज्ड उत्पादनांना उघडपणे पाठिंबा दिला आहे, असा आरोप त्यांनी केला.