वसई : सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) वसई-विरारमधील वास्तुविषारद (आर्किटेक्ट) आणि पालिका अभियंत्यांच्या निवासस्थानी छापे टाकले आहे. नालासोपारामधील ४१ अनधिकृत इमारत प्रकरणात पालिकेचे माजी नगररचना संचालक वाय.एस. रेड्डी यांच्यावरील कारवाईत मिळालेल्या माहितीनंतर हे छापे टाकण्यात आले आहेत.
१४ मे रोजी सक्तवसुली संचलनालायने (ईडी) वसई विरार महापालिकेचे माजी नगररचना संचालक वाय. एस. रेड्डी यांच्या हैद्राबाद येथील निवासस्थानासह वसई विरार मधील १३ ठिकाणी छापे घातले होते. यावेळी रेड्डी यांच्या घरातून ३२ कोटींचे सोने आणि रोकड जप्त करण्यात आली होती. रेड्डी यांच्याकडे बेहिशोबी मालमत्ता आली कुठून त्याचा ईडी तपास करत होते. त्या माहितीच्या अनुषंगाने ही कारवाई करण्यात आली आहे. सोमवारी सक्तवसुली संचलनालायने (ईडी) अचानक या प्रकरणाशी संबंधित वास्तुविषारद आणि नगररचना (टाऊन प्लानिंग) विभागातील अभियंत्याच्या घरी छापे टाकले आहे. या कारवाईचा अधिकृत तपशील अद्याप ईडीकडून जाहीर करण्यात आलेला नाही. इमारतींंना परवानी देण्यासाठी वास्तुविषारदांच्या माध्यमातून आर्थिक व्यवहार केला जात असल्याचा आरोप आहे. रोख रकमेच्या ऐवजी सोन्याच्या माध्यमातून रसद पुरवली जात असल्याची चर्चा आहे. रेड्डी यांच्यावरील कारवाईनतंर अनेक वास्तुविषारद परदेशात निघून गेले होते. मात्र प्रकरण निवळण्याचे समजून ते परतले होते.
१४ मे रोजी ईडीने वसई-विरार शहरासह १३ ठिकाणी एकाच वेळी छापे मारून चौकशी सुरू केली होती. या दरम्यान वसई -विरार महापालिकेचे नगररचना विभागाचे उपसंचालक रेड्डी यांच्या हैद्राबाद निवासस्थानी ईडीच्या अधिकाऱ्यांनी छापेमारी केली होती.
काय आहे प्रकरण?
नालासोपारा पूर्वेच्या अग्रवाल नगरी येथील४१ अनधिकृत इमारती जमीनदोस्त केल्यानंतर आता सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) या संपूर्ण घोटाळ्याची चौकशी सुरू केली होती. या अनधिकृत इमारती माजी नगरसेवक सीताराम गुप्ता याने बांधल्या होत्या. याप्रकरणात महापालिकेचे अधिकारी आणि नगररनचा उपसंचालक वाय. एस. रेड्डी जबाबदार असल्याची तक्रार माजी नगरसेवक धनंजय गावडे यांनी ईडीकडे केली होती. येथील रहिवाशांना बेघर करण्याचे षडयंत्र आखण्यात आले असून त्याची चौकशी करण्याची मागणी या तक्रारीत करण्यात आली होती. त्यानुसार मार्च महिन्यापासून ईडी या प्रकरणाचा पाठपुरावा करून चौकशी करत होती.