वसई-विरार शहरातील नागरिकांना पुढील काही दिवस पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे. वसई-विरार महानगरपालिकेने ‘सूर्या योजने’अंतर्गत सुरू असलेल्या तांत्रिक कामांमुळे ४ एप्रिल ते १० एप्रिल दरम्यान पाणीपुरवठा विस्कळीत राहणार असल्याची माहिती दिली आहे.
या कालावधीत शहरातील अनेक भागांत पाण्याचा दाब कमी राहण्याची शक्यता असून काही ठिकाणी पूर्णतः पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.
पाणीपुरवठ्यात मोठी तूट
सध्या शहराला दररोज सुमारे ४०० दशलक्ष लिटर पाण्याची गरज आहे. मात्र या कामांदरम्यान महत्त्वाच्या स्त्रोताचा पुरवठा पूर्णपणे बंद राहणार असल्याने सुमारे १५० दशलक्ष लिटर पाण्याची तूट निर्माण होणार आहे. त्यामुळे अनेक भागांत कमी दाबाने किंवा अपुरा पाणीपुरवठा होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
झोननिहाय पाणी कपात
पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी महानगरपालिकेकडून झोननिहाय पाणी वितरणाची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यानुसार विविध भागांत ठराविक दिवशी २४ तास पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
प्रत्येक झोनमध्ये सकाळी १० ते दुसऱ्या दिवशी सकाळी १० वाजेपर्यंत पाणीपुरवठा खंडित केला जाईल.
कोणत्या भागात कधी पाणी बंद?
४ एप्रिल २०२६ - विरार पूर्व व पश्चिम
५ एप्रिल २०२६ - नालासोपारा पूर्व व पश्चिम
६ एप्रिल २०२६ - नवघर, वसई
७ एप्रिल २०२६ - विरार पूर्व व पश्चिम
८ एप्रिल २०२६ - नालासोपारा पूर्व व पश्चिम
९ एप्रिल २०२६ - नवघर, वसई
१० एप्रिल २०२६ - विरार पश्चिम व नालासोपारा पश्चिम
नागरिकांना आवाहन
या कालावधीत पाणी साठवून ठेवावे आणि त्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. तसेच पाण्याचा अपव्यय टाळून महानगरपालिकेला सहकार्य करण्याचेही सांगण्यात आले आहे.
तांत्रिक कामे पूर्ण झाल्यानंतर पाणीपुरवठा पूर्ववत केला जाईल, असे आश्वासन प्रशासनाने दिले असून नागरिकांची गैरसोय कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहितीही देण्यात आली आहे.