केंद्र सरकारचा निर्णय; ‘आधार' ॲपची सक्ती नाही, प्री-इन्स्टॉलचा प्रस्ताव रद्द  
राष्ट्रीय

केंद्र सरकारचा निर्णय; ‘आधार' ॲपची सक्ती नाही, प्री-इन्स्टॉलचा प्रस्ताव रद्द

स्मार्टफोनमध्ये आधार ॲप प्री-इन्स्टॉल करण्याचा प्रस्ताव सरकारने रद्द केला आहे. उद्योगांच्या सुरक्षा आणि खर्चाबाबतच्या आक्षेपांनंतर IT मंत्रालयाने हा निर्णय घेतला.

किशोरी घायवट-उबाळे

स्मार्टफोनमध्ये 'आधार' ॲप अनिवार्यपणे आधीच इन्स्टॉल करून देण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारने मागे घेतला आहे. उद्योग क्षेत्राशी चर्चा केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

IT मंत्रालयाची भूमिका स्पष्ट

युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI)ने जानेवारी महिन्यात स्मार्टफोनमध्ये बायोमेट्रिक ओळख ॲप प्री-इन्स्टॉल करण्याचा प्रस्ताव माहिती तंत्रज्ञान मंत्रालयासमोर ठेवला होता. मात्र, या प्रस्तावाला IT मंत्रालयाने पाठिंबा दिला नाही.

UIDAIच्या माहितीनुसार, मंत्रालयाने उद्योग क्षेत्राशी सल्लामसलत केल्यानंतर हा प्रस्ताव नाकारण्याचा निर्णय घेण्यात आला.

सुरक्षा आणि खर्चाबाबत उद्योगांचे आक्षेप

माहितीनुसार, स्मार्टफोन उत्पादक कंपन्या आणि इलेक्ट्रॉनिक्स उद्योगाने या प्रस्तावाला तीव्र विरोध दर्शवला होता. डेटा सुरक्षा आणि गोपनीयतेबरोबरच उत्पादन खर्च वाढण्याची शक्यता याबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली. ॲपल आणि सॅमसंग यांसारख्या कंपन्यांनी सुरक्षा आणि प्रायव्हसीबाबत आक्षेप घेतल्याची माहिती समोर आली आहे.

स्वतंत्र उत्पादन व्यवस्थेची गरज

उद्योग प्रतिनिधींनी असेही नमूद केले की, भारतात विक्रीसाठी असलेल्या स्मार्टफोनसाठी वेगळी उत्पादन साखळी उभारावी लागेल, ज्यामुळे खर्च वाढण्याची शक्यता असून, भारताला इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन केंद्र बनवण्याच्या प्रयत्नांवर त्याचा परिणाम होऊ शकतो.

दोन वर्षांत सहावा प्रयत्न

गेल्या दोन वर्षांत सरकारी ॲप्स प्री-इन्स्टॉल करण्यासाठी हा सहावा प्रयत्न होता. यापूर्वीही उद्योग क्षेत्राने प्रत्येकवेळी याला विरोध केला होता.

'संचार साथी' ॲपचाही प्रस्ताव मागे

यापूर्वी डिसेंबरमध्ये सरकारने 'संचार साथी' सायबर सुरक्षा ॲप प्री-इन्स्टॉल करण्याचा प्रस्ताव मांडला होता. मात्र, सुरक्षा आणि गोपनीयतेच्या मुद्द्यांवरून टीका झाल्यानंतर तो निर्णयही मागे घेण्यात आला.

या निर्णयामुळे स्मार्टफोन उत्पादकांना दिलासा मिळाला असून, उद्योग क्षेत्रातील सुरक्षा आणि खर्चाशी संबंधित चिंता लक्षात घेत सरकारने मागे पाऊल टाकल्याचे स्पष्ट झाले आहे.

कोठडीमुळे कामावर गैरहजर राहिलेल्या कर्मचाऱ्याला पगार नाही

बस्तर सफरीवर निघालेल्या मुंबईच्या २४ वर्षीय बायकरचा अपघातात मृत्यू; १५ तासांपूर्वी केली होती 'लेट्स एक्सप्लोर बस्तर' पोस्ट

मुंबईतील स्विमिंग पुलांना पुन्हा पाणीपुरवठा; सातही धरणातील पाणीसाठा योग्य

सिद्धिविनायक मंदिर परिसराला नवी झळाळी; ७८ कोटी खर्च; भूमिगत पार्किंग, भिंतींचे स्टोन क्लॅडिंग; कामाचा १५ ऑगस्टपासून शुभारंभ

सातबारावर नाव नसलेल्या शेतकऱ्यांना रेकॉर्डवर आणणार; महसूलमंत्र्यांचे आदेश; कर्जमाफी, शासकीय योजनांचा मिळणार लाभ