नवी दिल्ली : नवी दिल्लीहून सॅन फ्रान्सिस्कोसाठी उड्डाण केलेले एअर इंडियाचे विमान हवेतच तांत्रिक बिघाड झाल्यामुळे पुन्हा दिल्लीला परतले. यामुळे प्रवाशांना तब्बल ८ तासांपेक्षा जास्त वेळ हवेत घालवावा लागला, अशी माहिती एअर इंडिया आणि फ्लाइट-ट्रॅकिंग डेटाद्वारे मिळाली आहे.
सुमारे २३० प्रवासी असलेले हे विमान ३ तासांपेक्षा जास्त वेळ हवेत होते आणि चीनच्या हवाई हद्दीतून जात असताना त्यात बिघाड झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर वैमानिकाने विमान दिल्लीच्या दिशेने वळवण्याचा निर्णय घेतला. बोईंग ७७७-३००ईआर या विमानाने दिल्लीहून सॅन फ्रान्सिस्कोसाठी उड्डाण केले होते. मात्र, प्रवाशांच्या सुरक्षेचा विचार करता, मानक सुरक्षा नियमांचे पालन करत हे विमान पुन्हा दिल्लीत उतरवण्यात आले.
पर्यायी व्यवस्था
या बिघाडामुळे प्रवाशांना झालेल्या त्रासाबद्दल एअर इंडियाने खेद व्यक्त केला आहे. तसेच प्रवाशांना त्यांच्या नियोजित स्थळी लवकरात लवकर पोहोचवण्यासाठी पर्यायी विमानाची व्यवस्था केली जात असल्याचे कंपनीने सांगितले. आमचे ग्राउंड क्रू प्रवाशांना सर्व आवश्यक ती मदत पुरवत आहेत. प्रवाशांच्या इच्छेनुसार त्यांना अल्पोपहार, हॉटेलमध्ये राहण्याची सोय आणि तिकिटे री-शेड्युल (दुसऱ्या वेळेत नियोजित करणे) करून देण्याचे पर्याय उपलब्ध करून दिले जात आहेत, असेही एअर इंडियाने स्पष्ट केले.