कोलकाता : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बुधवारी सकाळी विमान अपघातात निधन झाले त्यामुळे आपल्याला धक्का बसल्याचे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे. ममता बॅनर्जी यांनी या अपघातामागे कटाची शक्यता वर्तवत सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली चौकशीची मागणी केली आहे.
ममता बॅनर्जी यांनी या घटनेवर शोक व्यक्त करत राजकीय नेत्यांच्या सुरक्षेवर प्रश्न उपस्थित केला आहे. अजित पवार भाजप सोडण्याच्या आणि महायुतीपासून दूर जाण्याच्या विचारात होते, अशा चर्चा सोशल मीडियावर होत्या. त्यामुळे या अपघाताची निष्पक्ष चौकशी होणे आवश्यक आहे. आपला केवळ सुप्रीम कोर्टावरच विश्वास आहे. इतर तपास यंत्रणांवर नाही, असे ममतांनी बुधवारी माध्यमांशी बोलताना म्हटले आहे.
धक्कादायक घटना
याबाबत ममता यांनी सोशल मीडियावर एक पोस्टही केली आहे. ममता बॅनर्जी यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, अजित पवार यांच्या आकस्मिक निधनाने मला प्रचंड धक्का बसला आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा सकाळी बारामती येथे झालेल्या विमान अपघातात मृत्यू झाला, ही बातमी ऐकून खूप दुःख झाले. हे नुकसान कधीही भरून न येणारे आहे.
शरद पवारांची प्रतिक्रिया
ममता बॅनर्जींनी घातपाताचा संशय व्यक्त केल्यानंतर शरद पवार यांनीही प्रतिक्रिया दिली आणि यात राजकारण न आणण्याची विनंती केली. मी आज मिडियासमोर येणार नव्हतो पण काही माध्यमांमध्ये ह्या अपघातामागे काही राजकारण आहे अशा प्रकारची भूमिका कलकत्त्यावरून मांडली गेली, असं कळलं. पण ह्यात राजकारण नाही हा निव्वळ अपघात आहे. ह्या मृत्यूच्या यातना महाराष्ट्राला, आम्हा सगळ्यांना आहेत. कृपया ह्यात राजकारण आणू नये. एवढंच सांगायचं आहे, असे शरद पवार म्हणाले.