बांगलादेशकडून मर्यादित कांदा आयातीला हिरवा कंदील 
राष्ट्रीय

बांगलादेशकडून मर्यादित कांदा आयातीला हिरवा कंदील; भारताच्या कांदा निर्यातीला गती, शेतकरी व व्यापाऱ्यांना दिलासा

देशांतर्गत बाजारातील दर नियंत्रणात ठेवण्यासाठी बांगलादेश सरकारने दररोज नियंत्रित पद्धतीने आयात परवाने देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार दररोज ५० आयात परवाने दिले जाणार असून प्रत्येक परवान्यानुसार ३० टन कांदा आयात केला जाणार आहे. यामुळे एका दिवसाला सुमारे १५ हजार क्विंटल कांद्याच्या निर्यातीला परवानगी मिळणार असल्याची माहिती आहे.

Swapnil S

हारून शेख / लासलगाव

बांगलादेश सरकारने ७ डिसेंबरपासून मर्यादित प्रमाणात कांदा आयात सुरू करण्याचा निर्णय घेतल्यामुळे भारतातील कांदा उत्पादक शेतकरी आणि निर्यातदार वर्गाला मोठा दिलासा मिळण्याची चिन्हे आहेत. देशांतर्गत बाजारातील दर नियंत्रणात ठेवण्यासाठी बांगलादेश सरकारने दररोज नियंत्रित पद्धतीने आयात परवाने देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार दररोज ५० आयात परवाने दिले जाणार असून प्रत्येक परवान्यानुसार ३० टन कांदा आयात केला जाणार आहे. यामुळे एका दिवसाला सुमारे १५ हजार क्विंटल कांद्याच्या निर्यातीला परवानगी मिळणार असल्याची माहिती आहे.

बांगलादेश हा भारताचा परंपरागत आणि मोठा कांदा आयातदार देश आहे. गेल्या काही महिन्यांपासून कांदा आयात बंद असल्यामुळे महाराष्ट्रातील नाशिक, लासलगाव, पिंपळगाव बसवंत, पुणे, अहिल्यानगर तसेच आशियातील सर्वात मोठ्या कांदा बाजारांवर त्याचा विपरीत परिणाम जाणवत होता. आता आयात मार्ग पुन्हा खुला झाल्यामुळे भारतीय कांदा व्यापाराला गती मिळेल, तसेच बाजारातील दरांना आधार मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. व्यापाऱ्यांच्या मते, आयात मर्यादित असली तरी मागणीत वाढ होऊन कांद्याच्या दरांमध्ये काही प्रमाणात सुधारणा होऊ शकते. जर इतर देशांनीही भारतातून कांदा आयात करण्याचा निर्णय घेतला, तर कांद्याच्या दरात आणखी सुधारणा होऊ शकते, असे सांगत भारत दिघोळे म्हणाले, केंद्र सरकारने पुढील काळात कांदा निर्यातीवर कोणतीही बंदी घालू नये. निर्यात सातत्याने सुरू राहिली तर भारतीय शेतकऱ्यांचा कांदा जागतिक बाजारात पोहोचेल आणि त्याचा मोठा फायदा मिळेल.

बांगलादेश सरकारने स्पष्ट केले आहे की, यापूर्वी अर्ज केलेल्या आयातदारांनाच परवाने दिले जाणार असून बाजारातील परिस्थिती पाहून ही आयात प्रक्रिया पुढील आदेशापर्यंत सुरू राहणार आहे.

नैसर्गिक आपत्तींनी शेतकरी अडचणीत

उन्हाळ कांद्याला यंदा अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला. त्यानंतर राज्यातील अनेक भागांत पूरस्थिती निर्माण झाली. काही ठिकाणी कांद्याची पिके वाया गेली, तर काही ठिकाणी जमीनच वाहून गेल्याच्या घटना घडल्या. यामुळे शेतकरी आधीच अडचणीत सापडले असून, सध्या कांद्याच्या दरात मोठी घसरण दिसून येत आहे. अशा परिस्थितीत बांगलादेशचा आयात निर्णय शेतकऱ्यांसाठी आशेचा किरण ठरत आहे.

दररोज १५ हजार क्विंटल कांदा निर्यातीला परवानगी मिळणे हा शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा आहे. यामुळे कांद्याच्या दरवाढीस चालना मिळणार असून थेट फायदा उत्पादक शेतकऱ्यांना होणार आहे.केंद्र सरकारने वेळेवर विविध देशांना कांदा निर्यातीची परवानगी दिली असती, तर शेतकऱ्यांना कमी दरात कांदा विकण्याची वेळ आली नसती. तरीही उशिराने का होईना, हा निर्णय स्वागतार्ह आहे.
भारत दिघोळे, राज्याध्यक्ष कांदा उत्पादक शेतकरी संघटना
नियंत्रित पद्धतीने का होईना, पण आयात सुरू झाल्याने भारतातून बांगलादेशकडे कांदा निर्यात वाढण्याची दाट शक्यता आहे. आगामी काही आठवड्यांत याचा सकारात्मक परिणाम दरांवर दिसू शकतो.
विकास सिंह, कांदा निर्यातदार

'वंदे मातरम्' चर्चेत मोदींच्या भाषणावर काँग्रेसचा हल्लाबोल; प्रियंका गांधी म्हणाल्या, “मोदी उत्तम भाषण देतात, पण...

'वंदे मातरम्' चर्चेतून राजकारण तापलं, आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल; ‘वंदे मातरम्’वर भाजपचा दावा कशासाठी?

MPSC ची मोठी घोषणा : संयुक्त परीक्षांच्या तारखेत बदल; २१ डिसेंबरच्या मतमोजणीमुळे आयोगाचा महत्त्वाचा निर्णय

नाशिक-मुंबई लोकलचे स्वप्न पूर्ण होणार! कसारा-मुंबई, मनमाड-कसारा मार्गांवर प्रत्येकी दोन नवीन रेल्वे लाईनसाठी हिरवा कंदील

भारतातील रस्त्याला चक्क डोनाल्ड ट्रम्प यांचं नाव; 'या' राज्याची मोठी घोषणा, भाजपकडून टीकेची झोड