नवी दिल्ली : प्रवाशांसाठी दिलासादायक निर्णय घेत नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) विमान कंपन्यांसाठी तिकीट परतावा नियमांत सुधारणा केली आहे. ठराविक अटींच्या अधीन राहून, बुकिंग केल्यानंतर ४८ तासांच्या आत प्रवासी कोणतेही अतिरिक्त शुल्क न भरता तिकीट रद्द करू शकतात किंवा त्यात बदल करू शकतात.
मात्र, देशांतर्गत उड्डाणांसाठी प्रवासाची तारीख बुकिंगपासून ७ दिवसांपेक्षा कमी असल्यास ही सुविधा उपलब्ध राहणार नाही. आंतरराष्ट्रीय उड्डाणांच्या बाबतीत प्रवास तारीख बुकिंगपासून किमान १५ दिवसांनंतरची असणे आवश्यक आहे.
‘डीजीसीए’ ने स्पष्ट केले की, विमान कंपनीच्या अधिकृत संकेतस्थळावरून थेट तिकीट बुक केले असल्यास, बुकिंगनंतर २४ तासांत प्रवाशाने नावातील चूक निदर्शनास आणल्यास कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाही.
प्रवास एजंट/पोर्टलमार्फत तिकीट खरेदी केले असल्यास, परताव्याची जबाबदारी एअरलाइनचीच असेल. कारण एजंट हे त्यांच्या नियुक्त प्रतिनिधी असतात. एअरलाइनने १४ कामकाजाच्या दिवसांत परतावा प्रक्रिया पूर्ण झाल्याची खात्री करावी, असे नियामकाने नमूद केले. प्रवाशाला वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीमुळे तिकीट रद्द करावे लागल्यास संबंधित नियमांतही बदल करण्यात आले आहेत.
डिसेंबर २०२५ मधील ‘इंडिगो’च्या उड्डाणांतील गोंधळाच्या काळात तिकीट परताव्याचा मुद्दा ठळकपणे समोर आला होता. त्या वेळी नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने एअरलाइनला ठराविक कालमर्यादेत परतावा पूर्ण करण्याचे निर्देश दिले होते. सुधारित नियम २४ फेब्रुवारी रोजी जारी करण्यात आले.