नवी दिल्ली : भारताच्या इथेनॉल मिश्रित इंधन कार्यक्रमाबाबत पसरलेल्या शंकांचे सरकारने निरसन केले आहे. ई-२० इंधनाचा वापर केल्यामुळे वाहन विमा पॉलिसीची वैधता संपते किंवा त्यावर परिणाम होतो, या दाव्यांचे सरकारने खंडन केले आहे. हा कार्यक्रम पूर्णपणे सुरक्षित, ग्राहक-अनुकूल आणि आर्थिकदृष्ट्या फायदेशीर असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे.
तेल मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ई-२० इंधनाचा वापर आणि विम्याची वैधता यांचा संबंध जोडणारे दावे संबंधित भागधारकांशी चर्चा केल्यानंतर चुकीचे असल्याचे आढळले आहेत.
इथेनॉल मिश्रण ही जागतिक स्तरावर स्वीकारलेली पद्धत आहे. अमेरिका, ब्राझील आणि जपानसह अनेक देशांमध्ये हे यशस्वीपणे राबवले जात आहे. ब्राझीलमध्ये दीर्घकाळापासून ई-२७ हे मानक पेट्रोल मिश्रण म्हणून वापरले जाते, असे मंत्रालयाने नमूद केले आहे.
इथेनॉल मिश्रणाचे फायदे
कच्च्या तेलाची आयात कमी झाल्यामुळे भारताने आतापर्यंत १.४ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त परकीय चलन वाचवले आहे.
इथेनॉल उत्पादनासाठी लागणाऱ्या कृषी कच्च्या मालाची मागणी वाढल्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ झाली असून ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत झाली आहे.
हा कार्यक्रम भारताची ऊर्जा सुरक्षा वाढवण्यासाठी, कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी आणि स्वच्छ इंधनाकडे वाटचाल करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे.