PTI
राष्ट्रीय

हाथरस चेंगराचेंगरीप्रकरणी ६ सेवेकऱ्यांना अटक; 'भोलेबाबा' बेपत्ता?

हाथरस चेंगराचेंगरीप्रकरणी सहा सेवेकऱ्यांना अटक करण्यात आली असून त्यामध्ये दोन महिलांचा समावेश आहे. हे सर्वजण कार्यक्रम आयोजन समितीचे सदस्य आहेत, असे पोलिसांनी गुरुवारी सांगितले.

Swapnil S

हाथरस : हाथरस चेंगराचेंगरीप्रकरणी सहा सेवेकऱ्यांना अटक करण्यात आली असून त्यामध्ये दोन महिलांचा समावेश आहे. हे सर्वजण कार्यक्रम आयोजन समितीचे सदस्य आहेत, असे पोलिसांनी गुरुवारी सांगितले.

एफआयआरमध्ये केवळ एकाच सेवेकऱ्याचे नाव असून तो फरार झाला आहे. गरज भासल्यास सूरजपाल ऊर्फ नारायण सकर हरी ऊर्फ भोलेबाबा यांची चौकशी केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले. मुख्य आरोपी देवप्रकाश मधुकर याच्याविरुद्ध लवकरच अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात येणार असून एक लाख रुपयांचे इनामही जाहीर केले जाणार आहे, असे पोलिसांनी सांगितले.

भोलेबाबा बेपत्ता?

साकर विश्वहारी भोलेबाबा यांच्या आश्रमातील सुरक्षा व्यवस्थेची तपासणी करण्यासाठी पोलिसांनी आश्रमाच्या संकुलात प्रवेश केला, मात्र भोलेबाबा तेथे हजर नव्हते, असे पोलिसांनी सांगितले. हाथरस दुर्घटनेनंतर आश्रमाबाहेर पोलीस तैनात करण्यात आले आहेत. पोलीस आणि विशेष कृती दलाच्या कर्मचाऱ्यांनी बुधवारी रात्री आश्रमात प्रवेश केला होता. त्यावेळी आश्रमात काही महिलांसह ५०-६० स्वयंसेवक हजर होते. भोलेबाबा आश्रमात होते का, असे विचारले असता ते बुधवारी आणि गुरुवारीही आश्रमात नसल्याचे पोलिसांनी सांगितले. आम्ही आश्रमात चौकशीसाठी नव्हे तर सुरक्षा व्यवस्थेची तपासणी करण्यासाठी गेलो होतो, असे पोलिसांनी एका प्रश्नाला उत्तर देताना स्पष्ट केले. उत्तर प्रदेश सरकारने या दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी तीन सदस्यीय न्यायिक आयोग स्थापन केला असून त्यांचा अहवाल दोन महिन्यांत सादर केला जाणार आहे. या चेंगराचेंगरीमागे कारस्थान होते का, याचाही तपास केला जाणार आहे.

राहुल गांधी हाथरसला जाणार

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी हाथरसला भेट देण्याची शक्यता आहे, असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते के. सी. वेणुगोपाळ यांनी सांगितले. हाथरस भेटीत राहुल गांधी दुर्घटनाग्रस्तांशी संवाद साधण्याची शक्यता आहे, असेही ते म्हणाले.

दुर्घटनेतील मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात

चेंगराचेंगरीत मरण पावलेल्या सर्व जणांची ओळख पटली असून त्यांचे मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले असल्याचे जिल्हा दंडाधिकारी आशिषकुमार यांनी सांगितले. या चेंगराचेंगरीत १२१ जण मरण पावले असून त्यामध्ये बहुसंख्य महिलांचा समावेश आहे. दुर्घटनेत ३१ जण जखमी झाले आहेत.

मुंबईसह राज्यातील कबुतरखाने बंद होणार; उद्योग मंत्री उदय सामंत यांची माहिती

बाळ चोरीला गेल्यास रुग्णालयाची नोंदणी रद्द होणार; राज्य सरकारचा निर्णय

मुंबई, दिल्ली मेट्रो शहरांचा झगमगाट आता संधीच्या नकाशावर मागे! आता Freshers साठी चेन्नई ठरतंय पगाराचा नवा 'हॉटस्पॉट'

आता २४ तास वाळू वाहतूक; GPS, CCTV बसवणे बंधनकारक; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची सभागृहात घोषणा

सरकारी यंत्रणा शेतकऱ्यांची मारेकरी! महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राहुल गांधी आक्रमक