इंदूर : इंदूरमध्ये दूषित पिण्याच्या पाण्यामुळे उलट्या आणि अतिसाराचा उद्रेक झाला असून, त्यात सहा जणांचा मृत्यू झाला आहे आणि २०० हून अधिक नागरिकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने शनिवारी दिली.
इंदूरचे महापौर पुष्यमित्र भार्गव यांनी शुक्रवारी दूषित पाण्यामुळे १० रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाल्याचे सांगितले होते. मात्र, भगीरथपुरा परिसरातील रहिवाशांचा दावा आहे की सहा महिन्यांच्या एका बालकासह एकूण १६ जणांचा मृत्यू झाला आहे. 'सध्या शहरातील ४१ रुग्णालयांमध्ये २०३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत आणि सहा जणांचा मृत्यू झाला आहे, असे जिल्हाधिकारी शिवम वर्मा यांनी सांगितले. रुग्णालयात दाखल रुग्णांपैकी ३४ जण अतिदक्षता विभागात (आयसीयू) असून, त्यांच्या उपचारांवर विशेष लक्ष ठेवले जात आहे.