नवी दिल्ली : भारतीय हवामान खात्याने काळजात धडकी भरविणारा अंदाज व्यक्त केला आहे. या अंदाजानुसार गुरुवारी महाराष्ट्रासह २६ राज्यांना १३ तास संकटाचे असल्याचा अशारा दिला आहे. या कालावधीत मुसळधार पाऊस, ताशी ८५ कि.मी. वेगाने वाहणारे वारे आणि दरडी कोसळण्याचा धोकाही वर्तविला आहे. गरज असेल तरच घराबाहेर पडण्याचे आवाहनही हवामान खात्याने केले आहे.
महराष्ट्रासह उत्तर प्रदेश, बिहार, दिल्ली आदी २६ राज्यांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. काही राज्यांमध्ये ताशी ८५ किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यताही वर्तविली असून डोंगराळ भागात दरड कोसळणे आणि भूस्खलनाच्या घटना घडण्याची भीतीही व्यक्त करण्यात आली आहे. गरज असेल तरच घरातून बाहेर पडा. घरातून बाहेर पडताना एकदा हवामानाचा अंदाज घेऊनच बाहेर पडा, असे हवामान खात्याने म्हटले आहे.
नाशिकला अलर्ट
दरम्यान, नाशिकला आज पावसाचा यलो अलर्ट देण्यात आलेला आहे. शहर आणि परिसरात वेगवान वाऱ्यासह मध्यम सरींचा पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आज घाटमाथ्याच्या परिसरात वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात पावसाची शक्यता आहे. शहर, उपनगरांसह जिल्ह्यात मध्यम स्वरूपाच्या सरींचा अंदाज आहे.
कोणत्या राज्यात इशारा
पूर्वेकडे आसाम आणि आसपासच्या परिसरात चक्रीवादळ सदृश्य परिस्थिती तयार झाली आहे. ही सिस्टिम येत्या २४ तासात झारखंड मार्गे पश्चिम-उत्तर- पश्चिम दिशेने पुढे सरकण्याची शक्यता आहे. उद्या २७ ऑगस्ट रोजी देशातील २६ राज्यात जोरदार वाऱ्यांसह अतिमुसळधार पाऊस कोसळणार आहे. यूपी, बिहार, दिल्ली, हरयाणा, राजस्थान, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, पंजाब, जम्मू-कश्मीर, झारखंड, पश्चिम बंगाल, ओदिशा, मध्य प्रदेश, छत्तीसगढ़, महाराष्ट्र, गुजरात, आसम, केरळम्, तामिळनाडु, मेघालय, त्रिपुरा, अरुणाचल प्रदेश, नागालँड, मिझोराम, तेलंगाना आणि सिक्किम आदी राज्यांमध्ये मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तवण्यता आली आहे. शेतकरी आणि मच्छिमारांसाठीही विशेष इशारा देण्यात आला आहे.