फोटो - विवेक मराठी
राष्ट्रीय

मारुती चितमपल्ली यांचे निधन; आज होणार अंत्यसंस्कार

‘अरण्यऋषी’ मारुतीराव भुजंगराव चित्तमपल्ली यांचे बुधवारी सायंकाळी निधन झाले. ते ९३ वर्षांचे होते. अक्कलकोट रोडवरील त्यांच्या निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांची अंत्ययात्रा गुरुवारी दुपारी १ वाजता राहत्या घरापासून निघणार आहे. त्यांच्यावर रूपा भवानी मंदिराजवळील हिंदू स्मशान भूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

Swapnil S

सोलापूर : ‘अरण्यऋषी’ मारुतीराव भुजंगराव चित्तमपल्ली यांचे बुधवारी सायंकाळी निधन झाले. ते ९३ वर्षांचे होते. अक्कलकोट रोडवरील त्यांच्या निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांची अंत्ययात्रा गुरुवारी दुपारी १ वाजता राहत्या घरापासून निघणार आहे. त्यांच्यावर रूपा भवानी मंदिराजवळील हिंदू स्मशान भूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

यंदा त्यांना ‘पद्मश्री’ पुरस्कार देऊन राष्ट्रपतींच्या हस्ते गौरविण्यात आले होते. त्यांच्या पश्चात भावजय, दोन पुतणे, सुना व नातवंडे असा परिवार आहे. पद्मश्री पुरस्कार स्वीकारण्यास ते दिल्लीला गेले होते. त्या प्रवासामुळे त्यांना कमालीचा थकवा जाणवत होता. गेल्या दहा दिवसांपासून त्यांनी अन्न घेणेही बंद केले होते.

मारुती चित्तमपल्ली यांचा जन्म ५ नोव्हेंबर १९३२ साली सोलापूर येथे झाला होता. ते भारतीय निसर्गवादी, वन्यजीव संरक्षक आणि प्रख्यात मराठी लेखक होते. चित्तमपल्ली यांनी कोईम्बतूर येथील ‘स्टेट फॉरेस्ट सर्व्हिस’ कॉलेजमधून शिक्षण घेतले. त्यानंतर त्यांनी महाराष्ट्र सरकारच्या वन विभागात ३६ वर्षांहून अधिक काळ सेवा केली. त्यांनी कर्नाळा पक्षी अभयारण्य, नवेगाव राष्ट्रीय उद्यान, नागझिरा वन्यजीव अभयारण्य आणि मेळघाट व्याघ्र प्रकल्प यांसारख्या विविध जंगलांमध्ये आणि राष्ट्रीय उद्यानांमध्ये काम केले. वन्यजीव संरक्षणात त्यांचे मोठे योगदान आहे. नागझिरा आणि मेळघाट येथे विस्थापित वन्यजीवांसाठी अनाथाश्रम उभारण्यास त्यांनी मदत केली. त्यांना १८ भाषांचे ज्ञान होते, ज्यात संस्कृत, जर्मन आणि रशियन भाषांचा समावेश आहे.

साहित्यिक योगदान

मारुती चित्तमपल्ली यांचे साहित्य मुख्यतः मराठी भाषेत असून ते वन्यजीव, निसर्ग आणि आदिवासी जीवनावर केंद्रित आहे. त्यांच्या अनुभवांमधून आणि सखोल अभ्यासातून त्यांनी मराठी साहित्यात एक अद्वितीय स्थान निर्माण केले आहे. त्यांची लेखनशैली ओजस्वी आणि माहितीपूर्ण आहे, जी वैज्ञानिक ज्ञानाला सर्जनशील कथेशी जोडते. त्यांच्या लेखनात वन्यजीवांचे वर्तन, वनस्पती, पक्षी आणि जंगलांशी संबंधित रहस्ये यांचा समावेश आहे. त्यांनी त्यांचे अनुभव वाचकांसमोर जिवंतपणे मांडले आहेत. त्यांची "चकवा चांदणं" ही आत्मकथा खूप प्रसिद्ध आहे. तसेच त्यांनी निलवंती, जंगलाचं देणं, घरट्या पलिकडे, रातवा, रानवाटा आदी पुस्तके लिहून मराठी साहित्यात मोलाची भर घातली.

२०१७ मध्ये, त्यांना महाराष्ट्र सरकारद्वारे विंदा करंदीकर स्मृती जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. २००६ मध्ये सोलापूर येथे झालेल्या मराठी साहित्य संमेलनाचे त्यांनी अध्यक्षपद भूषवले होते.

अदानींनी अंबानींना मागे टाकले; गौतम अदानी ठरले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती

केंद्र सरकारचा निर्णय; ‘आधार' ॲपची सक्ती नाही, प्री-इन्स्टॉलचा प्रस्ताव रद्द

Dhule : 'कोणीतरी ओढत नेतंय'? १८ वर्षीय तरुणी दिवसाढवळ्या बेपत्ता; CCTV मधील दृश्यांमुळे नागरिक हैराण

पवन खेडा यांना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा नाही; अटकपूर्व जामिनासाठी आसाम न्यायालयात जाण्याचे निर्देश

Nagpur : १८ बाटल्या फोडल्या; दारू नाकारताच तरुणांचा बारमध्ये धुडगूस, मॅनेजर रक्तबंबाळ, VIDEO व्हायरल