मुर्शिदाबाद : वक्फ कायद्याविरोधात प. बंगालच्या मुर्शिदाबाद जिल्ह्यात हिंसाचारानंतरची परिस्थिती तणावपूर्ण आहे. याप्रकरणी आतापर्यंत १२ जणांना अटक झाली आहे. मुर्शिदाबाद येथील परिस्थिती गंभीर बनली असून अनेक हिंदू कुटुंबांना घर सोडून गेली आहेत, असा आरोप भाजपने केला आहे.
गेल्या काही दिवसांपासून मुर्शिदाबाद जिल्ह्यातील अनेक भागांत हिंसाचार होत आहे. शनिवारी वडील-मुलासह तिघांची हत्या झाली होती. हिंसा रोखण्यासाठी सीमा सुरक्षा दलाच्या ८ कंपन्या व एक हजार पोलीस तैनात केले आहेत. यात पोलीस महानिरीक्षक व पोलीस अधीक्षक स्तरावरचे अधिकारी उपस्थित आहेत.
मुर्शिदाबादच्या धुलियान भागातून ५०० हून अधिक जणांनी पलायन केले आहे. त्यांनी मालदाच्या वैष्णवनगर भागातील शाळेत आश्रय घेतला आहे. आमच्या घराची मोडतोड करून पिण्याच्या पाण्यात विष कालावल्याचा आरोप या नागरिकांनी केला आहे.
दरम्यान, सुती, धुलियान, समशेरगंज, जांगीपूर येथील भागात शांततेचे वातावरण आहे. हिंसाचारग्रस्त भागात प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत. तसेच इंटरनेट सेवा बंद केली आहे. मुख्य रस्त्यावरील वाहनांची तपासणी सुरू असून संवेदनशील भागात गस्त सुरू आहे. या हिंसाचाराची चौकशी सुरू आहे.
राष्ट्रपती राजवट लागू करा - भाजप
प. बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणी भाजपचे खासदार जगदंबिका पाल यांनी केली आहे. राज्यात राष्ट्रपती राजवटीची गरज आहे. ज्या प्रकारे प. बंगालमध्ये हिंसाचार सुरू होता, त्यातून जाणवत होते की, याला ममता सरकारचे खुलेआम संरक्षण होते. सरकारच्या मंत्र्यांनी जमावाला भडकावले. त्यामुळे येथे राष्ट्रपती राजवट गरजेची आहे, असे पाल म्हणाले.