NEET पेपरफुटी हे ‘घोर पाप’; पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिक्रिया संग्रहित छायाचित्र
राष्ट्रीय

NEET पेपरफुटी हे ‘घोर पाप’; पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिक्रिया

नीट प्रकरणावरून देशभरात वातावरण तापलेले असताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या समस्येवर आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

Swapnil S

नवी दिल्ली : नीट प्रकरणावरून देशभरात वातावरण तापलेले असताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या समस्येवर आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. नीटमधील अनियमितता आणि पेपरफुटी ही अत्यंत गंभीर बाब असून हे एक ‘घोर पाप’ आहे, अशा शब्दांत मोदी यांनी संताप व्यक्त केला. तरुणांच्या भविष्याशी कोणालाही खेळू दिले जाणार नाही, असा थेट इशारा देत त्यांनी या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले.

मंगळवारी संसद अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या खासदारांच्या 'मंगल मिलन' या बैठकीत ते बोलत होते. पेपरफुटीचा मुद्दा हा कोणत्याही एका पक्षाच्या राजकारणाचा नसून तो राष्ट्रीय हिताचा विषय आहे. त्यामुळे यावर मात करण्यासाठी केंद्र सरकार आणि सर्व राज्य सरकारांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे, असे आवाहन मोदी यांनी केले.

केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी बैठकीनंतर दिलेल्या माहितीनुसार, पेपरफुटीची घटना समोर येताच सरकारने तातडीने पावले उचलली आहेत. आतापर्यंत या प्रकरणी १३ जणांना अटक करून तुरुंगात पाठवण्यात आले आहे. दोषींना कठोर शिक्षा मिळावी यासाठी देशपातळीवरील उच्च दर्जाच्या वकिलांची मदत घेतली जात आहे.

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये यासाठी नीटची फेरपरीक्षा कोणत्याही विलंबाशिवाय त्वरित घेण्यात आली असून निकालही जाहीर करण्यात आले आहेत. एनडीएच्या खासदारांनी विद्यार्थ्यांमध्ये जाऊन त्यांचा विश्वास संपादन करावा आणि तरुणांशी आपुलकीने जोडले जावे, असा सल्ला पंतप्रधानांनी दिला. दोषींवर अशी कठोर कारवाई केली जाईल जी इतरांसाठी वस्तुपाठ ठरेल, जेणेकरून भविष्यात अशा प्रकारच्या घटनांची पुनरावृत्ती होणार नाही, असे रिजिजू म्हणाले.

अराजकाचा प्रयत्न- मुख्यमंत्री

मुंबई : काही स्वार्थी तत्त्वांनी स्वतःचे हेतू साध्य करण्यासाठी या आंदोलनात शिरकाव केला होता, असा गंभीर आरोप महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी केला. आंदोलनात सहभागी झालेल्या अनेक विद्यार्थ्यांच्या चिंता रास्त असू शकतात, असे नमूद करून ते म्हणाले की, काही घटकांनी केवळ आपला राजकीय अजेंडा रेटण्यासाठी या आंदोलनात प्रवेश केला. त्यांना केवळ अराजक निर्माण करायचे आहे, असेही ते म्हणाले.

पेपर मंत्र्यांनी फोडलाय का - बावनकुळे

नागपूर : कॉकरोच जनता पार्टीने पुकारलेले देशव्यापी आंदोलन ही निव्वळ एक 'नौटंकी' असल्याचा आरोप महाराष्ट्राचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंगळवारी केला. केंद्र सरकारला बदनाम करण्यासाठी आणि तरुणांच्या मनात असंतोष निर्माण करण्यासाठीच हा कृत्रिम राग निर्माण केला जात असल्याचा दावा त्यांनी केला. मी किंवा धर्मेंद्र प्रधान यांनी पेपर लीक केला आहे का, असा सवालही त्यांनी विचारला.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Mumbai Ganeshotsav 2026 : गिरगावात १३३ वर्षांची परंपरा; नारळापासून साकारली १० फुटांची मूर्ती, Video

Mumbai : अंधेरीत साकारणार मीनाक्षी मंदिर; क्रांती गणेशोत्सव मंडळाचे सुवर्ण महोत्सवी वर्ष

Mumbai : गणेशोत्सवासाठी महापालिका सज्ज; ३८३ कृत्रिम तलाव; १,१३२ जीवरक्षक तैनात

Mumbai : धोकादायक पुलांवर खबरदारी! गणेशोत्सवात सावधगिरीचे आवाहन; रेल्वे मार्गावरील पुलांचा समावेश

Mumbai : चेंबूरमध्ये चालत्या बेस्ट बसला आग; चालकाच्या प्रसंगावधानाने अनर्थ टळला, ४० प्रवासी बचावले