नवी दिल्ली : अमेरिकेच्या लष्करी हल्ल्यात तीन भारतीय खलाशांचा मृत्यू झाल्याच्या अत्यंत गंभीर प्रकरणावरून काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.
एक तडजोडवादी पंतप्रधान भारतमातेच्या सुपुत्रांचे रक्षण करू शकत नाही, अशा शब्दांत टीका करत राहुल गांधी म्हणाले की, ज्यांनी आपल्या खलाशांचे प्राण घेतले, त्यांना जाब विचारण्याचे किंवा त्यांना नाराज करण्याचे धाडस आणि ताकद पंतप्रधानांकडे नाही.
तीन निष्पापांप्रति बोलायला त्यांच्याकडे शब्दही नसेल
पंतप्रधानांवर टीका करताना ते पुढे म्हणाले, ‘ते कधीही एक शब्द उच्चारू शकत नाहीत. पुढील आठवड्यात जी-७ परिषदेमध्ये, आपल्या खलाशांच्या हत्येनंतर अवघ्या काही दिवसांतच मोदीजी हसतील, मिठी मारतील आणि करारांवर स्वाक्षऱ्या करतील. पण त्या तीन निष्पाप भारतीयांसाठी त्यांच्याकडे बोलायला एक शब्दही नसेल. तडजोडवादी पंतप्रधान भारतमातेच्या सुपुत्रांचे रक्षण करू शकत नाही, कारण ज्यांनी या सुपुत्रांचे प्राण घेतले, त्यांच्यासमोर उभे राहण्याचे धैर्य किंवा ताकद त्यांच्यात नाही.
पंतप्रधानांकडे बोलण्याचे धाडस हवे
राहुल गांधी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर हिंदीत एक पोस्ट शेअर करत या संपूर्ण प्रकरणावर व पंतप्रधान मोदींच्या मौनावर गंभीर सवाल उपस्थित केले आहेत. गेल्या तीन दिवसांत आंतरराष्ट्रीय जलक्षेत्रात तीन जहाजांवर झालेल्या अमेरिकन हल्ल्यात तीन भारतीयांना आपला जीव गमवावा लागला असून आपले तडजोडवादी पंतप्रधान एक शब्दही बोलत नाहीत. जेव्हा कोणतीही परकीय सत्ता एखाद्या भारतीय नागरिकाची हत्या करते, तेव्हा पंतप्रधानांकडे बोलण्याचे धाडस असायला हवे, असे राहुल गांधी म्हणाले.