हैदराबाद : तेलंगणा सरकारने डॉ. बी. आर. आंबेडकर प्राणहिता-चेवेल्ला सुजला प्रकल्पांतर्गत असलेल्या तुमडीहट्टी बंधाऱ्याची उंची आणि बांधकामाबाबत महाराष्ट्र सरकारशी चर्चा करण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून तेलंगणाच्या शिष्टमंडळासोबत चर्चा करण्यासाठी वेळ निश्चित करण्याची विनंती केली आहे.
या प्रकल्पांतर्गत तुमडीहट्टी येथे बॅरेज बांधण्याचे प्रस्तावित आहे. सुरुवातीला याची उंची १५२ मीटर ठेवण्याचे नियोजित होते, मात्र २३ ऑगस्ट २०१६ रोजी झालेल्या आंतरराज्य मंडळाच्या बैठकीत, महाराष्ट्र सरकारने १४८ मीटर उंचीच्या बांधकामाला सहमती दर्शवली होती.
तेलंगणा सरकारने अलीकडेच जलसिंचन तज्ज्ञांशी चर्चा केली. या चर्चेत असे समोर आले की, १४८ मीटर उंची उत्तर तेलंगणातील अदिलाबाद, निजामाबाद, करीमनगर आणि मेदक जिल्ह्यांची पिण्याच्या पाण्याची आणि सिंचनाची गरज पूर्ण करण्यासाठी पुरेशी नाही.