नवी दिल्ली : इराण युद्धाचे चटके विविध क्षेत्रांना जाणवू लागलेले असतानाच आणखी एक वाईट बातमी आली आहे. यंदा भारतावर पाऊसही रुसणार आहे, असा अंदाज खासगी हवामान कंपनी ‘स्कायमेट’ने व्यक्त केला आहे. दरम्यान, भारतीय हवामान खात्याचे भाकित पुढील आठवड्यात येईल, अशी अपेक्षा आहे.
देशात यंदा पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता ‘स्कायमेट’ने मंगळवारी वर्तवली आहे. दीर्घकालीन सरासरीच्या (एलपीए) ९४ टक्के पाऊस पडण्याचा अंदाज असून यात ५ टक्क्यांची त्रुटी राहू शकते. गेल्या वर्षी भारतामध्ये सरासरीपेक्षा ७.९ टक्के अधिक पाऊस झाला होता. स्कायमेटने दिलेल्या माहितीनुसार, यंदा मान्सून सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता ४० टक्के आहे. दुष्काळाची शक्यता ३० टक्के, सामान्य पावसाची शक्यता २० टक्के आहे.
प्रशांत महासागरातील परिस्थिती ‘अल निनो’साठी अनुकूल होत असल्याचे ‘स्कायमेट’चे व्यवस्थापकीय संचालक जतिन सिंग यांनी सांगितले. ‘अल निनो’मुळे मान्सूनचा दुसरा टप्पा विस्कळीत होण्याची शक्यता आहे. मात्र, हिंदी महासागरातील परिस्थिती सकारात्मक राहिल्यास ‘अल निनो’चा प्रभाव काही प्रमाणात कमी होऊ शकतो. यामुळे मान्सूनची सुरुवात चांगली होईल, मात्र दुसऱ्या सहामाहीत पावसाचे वितरण विस्कळीत राहण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. पंजाब, हरयाणा व राजस्थान या राज्यात ऑगस्ट आणि सप्टेंबर सामान्यपेक्षा कमी पाऊस पडणार आहे. देशाच्या पूर्व व उत्तर पूर्व भागात अन्य भारताच्या तुलनेत चांगला पाऊस पडेल.
अल नीनो म्हणजे काय?
अल नीनो म्हणजे प्रशांत महासागरात समुद्राच्या पृष्ठभागावरील तापमान सामान्यापेक्षा अधिक असते. तर ला नीना म्हणजे समुद्राच्या पृष्ठभागावरील तापमान थंड होते. हे मान्सून चांगला पडणार याचे संकेत असतात.