कोलकाता : जनसंघाचे संस्थापक श्यामाप्रसाद मुखर्जींच्या जन्मभूमीत भाजपचा सत्तेचा ७४ वर्षांचा वनवास अखेर संपुष्टात आला आहे. तृणमुल काँग्रेसच्या १५ वर्षांच्या सत्तेला भाजपने सुरुंग लावला आणि एकहाती सत्ता मिळवली.
पश्चिम बंगालच्या राजकारणातील महत्त्वाचे नेते सुवेंदु अधिकारी हे सध्या भाजपचे प्रभावशाली चेहरे मानले जातात. एकेकाळी ममता बॅनर्जी यांचे विश्वासू सहकारी असलेले सुवेंदु अधिकारी आता त्यांच्या कट्टर राजकीय प्रतिस्पर्थ्यांपैकी एक आहेत. मात्र, एक गोष्ट दोघांमध्ये समान आहे... दोघांनीही लग्न केलेले नाही.
सुवेंदु अधिकारी यांनी आपल्या आयुष्याचा मोठा भाग सार्वजनिक आणि राजकीय कार्यासाठी समर्पित केला आहे. त्यामुळेच त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलही लोकांमध्ये उत्सुकता दिसून येते. सुवेंदु अधिकारी यांनी स्वतः स्पष्ट केले आहे की त्यांनी लग्न न करण्याचा निर्णय जाणीवपूर्वक घेतला. त्यांचा राजकीय प्रवास १९८७ मध्ये विद्यार्थी चळवळीपासून सुरू झाला. त्यानंतर ते पूर्णपणे सार्वजनिक जीवनात सक्रिय झाले. त्यांच्या आयुष्यावर सतीश समंता, सुशील धारा आणि अजय मुखर्जी या स्वातंत्र्यसैनिकांचा मोठा प्रभाव होता. या तिघांनीही अविवाहित राहून समाजसेवा केली होती. त्यांच्याच प्रेरणेने सुवेंदु अधिकारी यांनीही लग्न न करण्याचा निर्णय घेतला आणि स्वतःला पूर्णपणे जनतेच्या सेवेसाठी वाहून घेतले.
कुटुंब रंगलंय राजकारणात
सुवेंदु अधिकारी यांचे कुटुंब पश्चिम बंगालच्या राजकारणात प्रभावशाली मानले जाते. वडील शिशिर कुमार अधिकारी हे केंद्रात मंत्री राहिले आहेत. भाऊ दिबीयेंदू अधिकारी आणि सौमेंधू अधिकारी हेही सक्रिय राजकारणात आहेत. पूर्व मेदिनीपूर भागात अधिकारी कुटुंबाचा मोठा राजकीय प्रभाव पाहायला मिळतो.
नंदीग्राममध्ये २०२१ मध्ये त्यांनी ममतांचा पराभव केला
विद्यार्थीदशेपासून त्यांची राजकीय सुरुवात झाली. सुरुवातीला ते तृणमूल काँग्रेसमध्ये होते. नंतर २०२० मध्ये तृणमूल सोडून भाजपमध्ये प्रवेश केला. २००७ मधील नंदीग्राम आंदोलनामुळे त्यांना मोठी ओळख मिळाली. त्यानंतर २००९ मध्ये ते पहिल्यांदा खासदार म्हणून निवडून आले. नंतर २०१६ मध्ये नंदीग्राममधून ते आमदार झाले. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर २०२१ मध्ये नंदीग्राममध्ये ममता बॅनर्जी यांचा त्यांनी पराभव केला आणि ते राष्ट्रीय राजकारणात ते चर्चेत आले.