नवी दिल्ली : 'बाई हिराबाई ट्रस्ट'च्या विश्वस्त निवडीतील पारशी किंवा झोरोस्ट्रियन धर्माच्या अटीसह इतर जाचक निर्बंध हटवण्यासाठी योग्य प्राधिकरणाकडे दाद मागण्याचा निर्णय 'टाटा ट्रस्ट'ने घेतला आहे. यासंदर्भात विश्वस्त मंडळाची १७ एप्रिल २०२६ रोजी नोएल एन. टाटा यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. 'टाटा ट्रस्ट'चे सर्वसमावेशक आणि धर्मनिरपेक्ष मूल्य जपण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे संस्थेने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे.
प्रसिद्ध उद्योगपती वेणू श्रीनिवासन आणि माजी संरक्षण सचिव विजय सिंह यांच्या 'बाई हिराबाई जमशेटजी टाटा नवसारी चॅरिटेबल इन्स्टिट्यूशन'मधील (बाई हिराबाई ट्रस्ट) नियुक्तीला टाटा ट्रस्टचे माजी विश्वस्त मेहली मिस्त्री यांनी महाराष्ट्र चॅरिटी कमिशनरकडे आव्हान दिले होते. श्रीनिवासन आणि सिंह हे ट्रस्टच्या नियमावलीतील पारशी झोरोस्ट्रियन धर्म आणि मुंबईतील रहिवासी असण्याच्या अटी पूर्ण करत नसल्याचा दावा मिस्त्री यांनी केला होता. या पार्श्वभूमीवर संस्थेने नियमावलीत बदल करण्याचा पवित्रा घेतला आहे.
'टाटा'ची मूल्ये नेहमीच सर्वसमावेशक आणि राष्ट्रसेवेवर लक्ष केंद्रित करणारी राहिली आहेत. सन २००० पासून भारताच्या माजी सरन्यायाधीशांच्या कायदेशीर सल्ल्यानुसार, या ट्रस्टमध्ये सातत्याने गैर-झोरोस्ट्रियन व्यक्तींची नियुक्ती केली जात आहे, असे ट्रस्टने निवेदनात स्पष्ट केले.