राष्ट्रीय

यंदा राख्यांची उलाढाल ६ हजार कोटी रुपयांपर्यंत वाढण्याची शक्यता

वृत्तसंस्था

महामारीमुळे गेल्या दोन वर्षांपासून कोलमडलेला राखीचा व्यवसाय आता पूर्णपणे सावरला आहे. कोरोनापूर्वीच्या तुलनेत यंदा व्यवसाय वाढलेला दिसत आहे. कच्च्या मालाच्या किमतीमुळे यंदा बाजारात राख्या महागल्या असल्या तरी गेल्या वर्षीच्या तुलनेत विक्री अधिक आहे. राखीच्या व्यवसायाशी संबंधित व्यावसायिकांच्या मते, गेल्या वर्षी राखीची ३,५००कोटी ते ४,५०० कोटी रुपयांची उलाढाल झाली होती. यंदा हा आकडा ५ हजार ते सहा हजार कोटी रुपयांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. एकूण खर्चात सुमारे ३० टक्क्यांनी वाढ झाली असली तरी केवळ २० ते २५ टक्क्यांनीच किमतीत वाढ झाली आहे. त्यामुळे नफा कमी झाला आहे, असे राखी निर्मात्यांचे म्हणणे आहे.

दिल्लीतील सदर बाजार हे देशातील राखी व्यवसायाचे मुख्य केंद्र आहे. येथील राखी व्यवसायाशी संबंधित व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे की, कोरोनामुळे राखी व्यवसायासाठी गेली दोन वर्षे चांगली गेली नाहीत, मात्र यंदा कोरोनाची भीती संपल्याने किरकोळ व्यापाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात राख्यांची खरेदी केली आहे. दरात वाढ झाली असली तरी यंदा ३० ते ५० टक्क्यांहून अधिक राख्यांची विक्री होण्याची शक्यता आहे. व्यापारी अनिल जैन यांनी सांगितले की, यंदा सुरुवातीला किरकोळ विक्रेत्यांनी भरपूर माल खरेदी केला. आता खरेदी मंदावली असल्याचे दिसून येत आहे. किरकोळ व्यापाऱ्यांनी संपूर्ण मालाची विक्री केली नाही, तर पेमेंट अडकण्याची भीती आहे.

बाजारात वाईट राखीला मोठी मागणी

यंदा बाजारात विविध प्रकारच्या राख्या पाहायला मिळत आहेत. इव्हिल आय म्हणजेच नजरबट्टू राखीला खूप मागणी आहे. या राख्या १० ते ५० रुपयांना मिळतात. किमतीत वाढ झाल्याने राख्या महाग झाल्या असल्या तरी गेल्या वर्षीच्या तुलनेत या व्यवसायात २० ते २५ टक्क्यांनी वाढ होऊ शकते, असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. मात्र, यंदा राखी बनवणाऱ्यांवरही वाढत्या खर्चाचा बोजा पडला आहे. मोती, धागे, मण्यांपासून ते पॅकेजिंगच्या किमती वाढल्या आहेत.

१२०० कोटींचा कच्चा माल चीनमधून आयात

चीनमधील मालावर बहिष्कार घालण्याचे आवाहन भारतीय व्यापाऱ्यांकडून गेल्या काही वर्षांपासून होत आहे. त्याला जोरदार प्रतिसाद मिळत असल्याचे सांगण्यात येते. गेल्या वर्षीही चीनमधील नव्हे तर देशांतर्गत राख्या वापरण्याचे आवाहन व्यापारी संघटनांकडून केले होते. परंतु राखी बनवण्यासाठी वापरण्यात येणारा कच्चा माल चीनमधून आयात केला जात आहे. यंदा या आयात मालाची किंमत तब्बल १ हजार ते १२०० कोटी रुपये आहे, असे सांगण्यात येते. दिल्ली व्यतिरिक्त पश्चिम बंगाल हे राखी उत्पादनाचे देशातील सर्वात मोठे केंद्र आहे. देशातील एकूण व्यवसायात बंगालचा वाटा ५० ते ६० टक्के आहे. त्यानंतर गुजरात, मुंबई, दिल्ली, राजस्थानमध्ये मोठ्या प्रमाणावर राख्या बनवल्या जातात. राखी थेट चीनमधून आयात केली जात नाही, परंतु ती तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे फॅन्सी पार्ट, फॉइल, फोम, सजावटीच्या वस्तू, दगड इत्यादी वस्तू तेथून येतात.

Lok Sabha Elections 2024: महाराष्ट्रात दुपारी ३ वाजेपर्यंत किती टक्के मतदान ? बघा संपूर्ण आकडेवारी

लातूर आणि माढा मतदारसंघातील EVM मशीनमध्ये बिघाड; २० ते ४५ मिनिटे मतदान खोळंबले

मराठी "not welcome" म्हणणार्‍या लोकांना कृपया मत देऊ नका; रेणुका शहाणेंची पोस्ट चर्चेत

मतदान केल्यानंतर सुप्रिया सुळे अचानक अजित पवारांच्या घरी; म्हणाल्या...

'धर्मवीर'चे खरे दिग्दर्शक तुम्हीच मग चित्रपट खोटा कसा? राजन विचारे यांचे मुख्यमंत्र्यांच्या आरोपांवर उत्तर