लोकसभेत आज (दि.८) वंदे मातरम गीताच्या १५० व्या वर्षानिमित्त ऐतिहासिक चर्चा सुरू झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या चर्चेची औपचारिक सुरुवात करताना, "भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात जनमानसाला प्रेरणा देणाऱ्या या गीतावर संसदेत चर्चा होणे, हा आमच्यासाठी सन्मानाचा क्षण आहे." असे म्हटले.
हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही सभागृहांमध्ये येत्या काही दिवसांत ही विशेष चर्चा पुढे चालणार आहे.
‘वंदे मातरम’च्या घोषणेचा स्वातंत्र्यासाठी लढा
पंतप्रधान मोदी म्हणाले, "आज आपण संसदेत बसलो आहोत कारण लाखो भारतीयांनी ‘वंदे मातरम’चा जयघोष करत स्वातंत्र्यलढ्यात सक्रिय सहभाग घेतला. हे गीत म्हणजे राष्ट्रभावनेचे प्रतीक आहे."
पुढे ते म्हणाले, "या गीताला १५० वर्ष पूर्ण होत असताना देशाने अलीकडेच संविधानाच्या ७५ वर्षांचा सोहळाही साजरा केला. या वर्षी अनेक महत्त्वपूर्ण राष्ट्रीय स्मरणदिनांचे औचित्य जुळले आहे. सरदार वल्लभभाई पटेल व भगवान बिरसा मुंडा यांच्या १५० व्या जयंती, तसेच गुरु तेज बहादूर यांच्या बलिदानाला ३५० वर्षे हा योग् जुळून आला आहे."
बंगालची बौद्धिक शक्ती संपूर्ण देशाला दिशा देणारी
पंतप्रधान मोदी म्हणाले की, "वंदे मातरम’ त्या काळात लिहिले गेले जेव्हा ब्रिटीश आपला ‘God Save the Queen’ हा राष्ट्रगीतप्रकार भारतातील प्रत्येक घरात पोहोचवण्याचा प्रयत्न करत होते."
"१८५७ नंतर भारतावर नियंत्रण ठेवणे ब्रिटिशांसाठी कठीण होत चालले होते, म्हणून त्यांनी ‘फोडा आणि राज्य करा’ ही नीती राबवली आणि बंगालला प्रयोगभूमी बनवले, असे पंतप्रधान मोदींनी सांगितले. "त्याकाळी बंगालची बौद्धिक शक्ती संपूर्ण देशाला दिशा देत होती," असेही त्यांनी नमूद केले.
वंदे मातरम्' सारखे भावकाव्य कुठेही नाही
“वंदे मातरम् मध्ये हजारो वर्षांची सांस्कृतिक ऊर्जा होती, त्यात स्वातंत्र्याचा जाज्वल्य उत्साहही होता आणि मुक्त भारताचे दूरदृष्टीचे स्वप्नही सामावलेले होते. वंदे मातरम् सारखे भावकाव्य कदाचित जगात कुठेही मिळणार नाही. कधी आपण विचार केला आहे का, संपूर्ण स्वातंत्र्यलढा हा वंदे मातरम् मधील भावनांमधूनच प्रवास करत होता, आणि त्याच्या विचारांवर, तर्कांवरच फुलत होता" असे नरेंद्र मोदी म्हणाले.
राज्यसभेत उद्या सुरू होणार खास चर्चा
लोकसभेत आजपासून चर्चा सुरु झाली असून या चर्चेत काँग्रेसतर्फे गौरव गोगोई आणि प्रियंका गांधी वाड्रा सहभाग घेणार आहेत. तर राज्यसभेत वंदे मातरमच्या १५० वर्षांवरील विशेष चर्चा ९ डिसेंबरपासून सुरू होणार आहेत.
लोकसभेत ९ आणि १० डिसेंबर तर राज्यसभेत १० आणि ११ डिसेंबरला निवडणूक सुधारणा चर्चा केली जाणार आहे.
सभागृहात विरोधकांचा गोंधळ
दरम्यान, राज्यसभेत प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान विरोधकांच्या जोरदार घोषणाबाजीमुळे कामकाज विस्कळीत झाले. चेअरमनने सदस्यांना शांत राहून मंत्र्यांना उत्तर देण्याची संधी देण्याचे आवाहन केले.