चेन्नई : तमिळनाडूमध्ये मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांच्या मंत्रिमंडळातील २३ नवनिर्वाचित मंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्यात राष्ट्रगीत आणि राज्याचे अधिकृत गीत वाजवण्याच्या क्रमावरून नवा राजकीय वाद पेटला आहे. अधिकृत शासकीय कार्यक्रमांमध्ये 'वंदे मातरम' आणि तमिळनाडूचे राज्यगीत 'तमिळ थाई वाझथू' यांना कोणते स्थान असावे, यावरून सत्ताधारी द्रमुक आणि सरकार आमनेसामने आले आहेत. शपथविधी सोहळ्यात तमिळ गीताच्या आधी 'वंदे मातरम' वाजवण्यात आल्याने द्रमुकने सरकारवर तमिळ परंपरेचा अवमान केल्याचा आणि राज्यात भाजप धर्तीचे राजकारण आणल्याचा आरोप केला.
द्रमुकच्या माहिती तंत्रज्ञान विभागाने सोशल मीडियावर या बदलाबाबत तीव्र आक्षेप घेतला आहे. शासकीय कार्यक्रमांची सुरुवात राज्यगीताने आणि सांगता राष्ट्रगीताने करण्याची तमिळनाडूची जुनी परंपरा मुख्यमंत्री विजय यांच्या सरकारने मोडल्याचे पक्षाने म्हटले आहे. यापूर्वी जुनी पद्धत पुन्हा सुरू करण्याचे आश्वासन देऊनही सरकारने ते पाळले नसल्याचा आरोप पक्षाने केला. द्रमुकचे प्रवक्ते टी. के. एस. एलांगोवन यांनी सांगितले की, राज्य सरकारचा प्रशासनावर कोणताही ताबा राहिलेला नाही. राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांच्या दबावाखाली हे सरकार काम करत असून तमिळ अस्मितेचा आदर राखण्यात अपयशी ठरल्याचे त्यांनी नमूद केले.
या वादाची पार्श्वभूमी १० मे रोजी झालेल्या मुख्यमंत्री विजय यांच्या स्वतःच्या शपथविधी सोहळ्याशी जोडलेली आहे, कारण तेव्हाही असाच क्रम ठेवण्यात आला होता. ज्येष्ठ द्रमुक नेते आर. एस. भारती यांनीही यावर टीका करताना, तमिळनाडूने नेहमीच हिंदी लादण्याच्या प्रयत्नांना विरोध करत आपली भाषिक ओळख जपली असल्याचे स्पष्ट केले.
दुसरीकडे, टीव्हीके नेते आधव अर्जुना यांनी हा क्रम अयोग्य असल्याचे सांगत आगामी काळात जुनी परंपरा पुनरुज्जीवित करण्याचा सरकारचा मानस असल्याचे स्पष्ट केले.