नवी दिल्ली: संसदेचे हिवाळी अधिवेशन १ डिसेंबरपासून सुरू होणार असून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्याला मंजुरी दिली आहे. बिहार निवडणूक निकालानंतर हे अधिवेशन होणार असल्याने त्या निकालाचे पडसाद, मतचोरी, एसआयआर आदी मुद्द्यांवरून सभागृहातील वातावरण चांगलेच तापणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. राष्ट्रपतींनी केंद्र सरकारच्या प्रस्तावाला मंजुरी दिल्याने संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबर या कालावधीत होणार आहे. संसदीय कामांची आवश्यकता पाहून हा अवधी वाढवला किंवा कमी केला जाऊ शकतो. केंद्रीय संसदीय कार्य मंत्री किरण रिजिजू यांनी याबद्दलची माहिती दिली.
संसदेच्या हिवाळी अधिवेशनात सरकार अनेक महत्त्वाची विधेयके मंजूर करण्याचा प्रयत्न करेल. घटनेत १२९ वी, १३० वी सुधारणा करण्यासाठी विधेयक मांडले जाईल. त्यासोबतच जन विश्वास विधेयक, दिवाळखोरी विधेयकही संसदेत आणण्यात येईल. याआधी २०१३ मध्ये संसदेचे सर्वात लहान हिवाळी अधिवेशन झाले होते. ५ ते १८ डिसेंबर या कालावधीत अधिवेशन झाले होते. केवळ १४ दिवसांच्या अधिवेशनात ११ बैठका झाल्या होत्या.