उरण : मोरा बंदर ते मुंबईतील भाऊचा धक्का दरम्यान प्रस्तावित रो-रो सेवेचा एप्रिल २०२६ अखेरपर्यंत पूर्णत्वाचा दिलेला मुहूर्त पुन्हा एकदा हुकला आहे. सुमारे ७५ कोटी रुपयांच्या या प्रकल्पाचे काम अनेक वर्षांपासून रखडले असून अद्यापही पूर्णत्वापासून दूर आहे.
उरण-मुंबई दरम्यान सध्या प्रवासी जलसेवा सुरू असली, तरी वाहनांसह प्रवास करता यावा यासाठी रो-रो सेवा सुरू करण्याचा प्रशासनाचा मानस आहे. मात्र या सेवेसाठी आवश्यक असलेली जेट्टी उभारणीची कामे संथगतीने सुरू आहेत. सुरुवातीला सुमारे ५० कोटी रुपये खर्च अपेक्षित असलेला हा प्रकल्प आता ७५ कोटींवर पोहोचला आहे.
सध्या मोरा जेट्टीवर केवळ सांगाडा उभारण्यात आला असून प्रत्यक्ष काम अपूर्णच आहे. २०१८ पासून सुरू असलेल्या या प्रकल्पाला अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागला आहे. मागील काही महिन्यांत कामाला गती मिळाल्याचे चित्र असले, तरी प्रत्यक्ष प्रगती मर्यादितच दिसून येते.
दरम्यान, रेवस जेट्टीच्या कामातही सुमारे ५ कोटी रुपयांची खर्चवाढ झाली आहे. या दोन्ही जेट्टींची कामे महाराष्ट्र मेरिटाइम बोर्ड यांच्या माध्यमातून सुरू आहेत. मात्र मोरा जेट्टीचे काम तब्बल नऊ वर्षांपासून रखडलेले असून जेट्टीपर्यंत जाणारा मार्गदेखील अद्याप पूर्ण झालेला नाही.
वारंवार काम बंद पडणे, निधीवाढ आणि नियोजनातील अडथळे यामुळे प्रकल्प पूर्ण होणार का, असा प्रश्न प्रवाशांमध्ये उपस्थित होत आहे.