संग्रहित छायाचित्र 
नवी मुंबई

मुंबईकरांसाठी खास भेट! उरण मार्गावर १० अतिरिक्त उपनगरीय लोकल धावणार, नोकरदारांना मोठा दिलासा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून रेल्वे मंत्रालयाकडून आलेले पत्र शेअर केले आहे. या पत्रात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे आभार मानले आहेत.

किशोरी घायवट-उबाळे

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी (दि.५) उरण मार्गावरील अतिरिक्त उपनगरीय सेवांना मंजुरी दिली. ही घोषणा करताच “ही मुंबईकरांसाठी खास भेट आहे,” असे ते म्हणाले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून रेल्वे मंत्रालयाकडून आलेले पत्र शेअर केले आहे. या पत्रात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे आभार मानले आहेत. त्यांनी सांगितले की, "या निर्णयामुळे नवी मुंबई आणि परिसरातील नोकरदारवर्गाला मोठा दिलासा मिळणार आहे."

पुढे ते म्हणाले, "तारघर आणि गव्हाण या स्थानकांना थांबा देण्याचा अनेक वर्षांचा स्थानिकांचा आग्रहही यानिमित्ताने मान्य करण्यात आला आहे."

उरण मार्गावर १० नवीन उपनगरीय सेवांना मंजुरी

रेल्वे मंडळाकडून ३ डिसेंबर २०२५ रोजी जारी करण्यात आलेल्या पत्रानुसार, बंदर मार्गामधील एकूण १० नवीन उपनगरीय गाड्या मंजूर करण्यात आल्या असून त्यामध्ये बेलापूर–उरण–बेलापूर अशा ६ लोकल फेऱ्यांचा समावेश आहे. महाराष्ट्र सरकारने २५ सप्टेंबर २०२५ रोजी पाठवलेल्या प्रस्तावाच्या आधारे ही मंजुरी देण्यात आली आहे. सार्वजनिक सोयीसाठी उपनगरीय रेल्वे सेवा वाढवण्याची विनंती राज्य सरकारने या प्रस्तावात केली होती.

तारघर आणि गव्हाण स्थानकांवर रेल्वे थांबणार

तारघर आणि गव्हाण स्थानकांवर थांबा देण्यालाही रेल्वे मंडळाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे उरण मार्गावरील वेगाने विकसित होत असलेल्या निवासी आणि औद्योगिक भागातील प्रवाशांची मोठी सोय होणार आहे.

बंदर मार्गावरील सेवांचा वेग वाढणार

नवीन सेवांसोबतच, नेरुळ–उरण आणि बेलापूर–उरण मार्गावरील गाड्यांचा वेग वाढवण्यासही मंत्रालयाने मान्यता दिली आहे.

तातडीने कारवाईचे निर्देश

रेल्वे अधिकाऱ्यांना ही अंमलबजावणी लवकरात लवकर करावी आणि प्रवाशांना याची व्यापक माहिती द्यावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. रेल्वे मंडळाने या प्रकरणाला 'अत्यंत महत्त्वाचे' असे वर्गीकरण करून मध्य रेल्वेला त्वरित कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.

नोकरदारांना मोठा दिलासा

या निर्णयाचे स्वागत करत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “नवीन सेवा आणि थांबे मिळाल्याने गर्दी कमी होईल, वेळ कमी होईल आणि नवी मुंबई-उरणदरम्यान प्रवास अधिक सोयीस्कर होईल.”

उरण मार्गावरील वाढत्या लोकसंख्येच्या आणि नोकरदारांच्या प्रवासाच्या दृष्टीने हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.

वाहतूकदारांचा राज्यव्यापी संप; बस-टॅक्सी सेवा ठप्प, शालेय विद्यार्थ्यांसह सर्वसामान्यांवर काय परिणाम?

Mumbai : India vs England सामन्यामुळे मरीन ड्राइव्ह परिसरात ट्रॅफिक अलर्ट; वाहतूक पोलिसांकडून पर्यायी मार्ग जाहीर, वाचा सविस्तर

Iran vs US-Israel War : मध्यपूर्वेतील संघर्षात वाढ; भारतीय नागरिकांसाठी परराष्ट्र मंत्रालयाकडून हेल्पलाइन क्रमांक जारी

Mumbai : वानखेडेवर India vs England सेमीफायनल; चाहत्यांसाठी मेट्रोच्या अतिरिक्त फेऱ्या, पाहा वेळापत्रक

दारूच्या वादातून वडिलांची कुऱ्हाडीने हत्या; म्हणाला "चुकून झालं", मृतदेह पाण्याच्या टाकीत टाकून बाहेर जाऊन खाल्ली बिर्याणी