शेखर हंप्रस/नवी मुंबई
पायधुनी येथे कलिंगड खाल्ल्यानंतर चार जणांचा मृत्यू झाल्याची अफवा पसरल्याने नवी मुंबईतील एपीएमसीतील कलिंगड ठोक विक्रेत्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. या अफवेचा थेट परिणाम बाजारावर झाला असून कलिंगड विक्रीत सुमारे ३० ते ४० टक्क्यांनी घट झाल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.
सध्या कडक उन्हाळ्यामुळे कलिंगडाला चांगली मागणी असताना अचानक या अफवेने बाजाराचे गणितच बदलले आहे. काही दिवसांपूर्वी १७ ते २० रुपये प्रतिकिलो दराने विकले जाणारे कलिंगड आता ८ ते १० रुपये प्रतिकिलो दराने विकावे लागत आहे. तरीही ग्राहकांचा प्रतिसाद अत्यल्प असल्याने व्यापारी हवालदिल झाले आहेत.
एपीएमसीतील ठोक विक्रेते नवी मुंबई एपीएमसी मार्केट परिसरात ग्राहकांची वाट पाहत बसावे लागत असल्याचे चित्र आहे. अफवेपूर्वी मालाला चांगला उठाव होता, मात्र आता दिवसेंदिवस विक्री घटत चालली आहे. काही
महानगरपालिकांनी आणि पोलिसांनी रस्त्यावर अनधिकृत फळविक्रीवर कारवाई केल्यानेही किरकोळ ग्राहक वर्ग कमी झाल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. यामुळे ठोक विक्रेत्यांचा मोठा ग्राहकवर्ग कमी झाला आहे.
वाशीतील ज्यूस विक्रेते अरविंद गुप्ता यांच्या म्हणण्यानुसार, ग्राहक आता कलिंगडाचा ज्यूस घेण्यासही टाळाटाळ करत आहेत. काही ग्राहक मिक्स फळांच्या ज्यूसमध्ये कलिंगड न वापरण्याच्या सूचना देत असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, २७ एप्रिल रोजी पायधुनी परिसरात एकाच कुटुंबातील चार जणांचा संशयास्पद मृत्यू झाला होता. प्राथमिक तपासात अन्नातून विषबाधेचा संशय व्यक्त करण्यात आला असून नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. मात्र कलिंगड खाल्ल्यामुळे मृत्यू झाल्याची अफवा पसरल्याने संपूर्ण फळबाजारावर परिणाम झाला आहे. व्यापाऱ्यांनी अफवा थांबवून अधिकृत अहवाल येईपर्यंत जनतेने घाबरून निर्णय घेऊ नये, अशी मागणी केली आहे.
अफवेपूर्वी कलिंगडाची विक्री सुरळीत होती. मात्र सध्या बाजार जवळपास ठप्प झाला आहे. मृत्यू नेमका कशामुळे झाला याचा अहवाल अद्याप प्रलंबित आहे. तरीही अफवेचा मोठा फटका आम्हाला बसला आहे.तोफीक खान, ठोक विक्रेते