संपादकीय

चमत्कारांचे दावे त्याला भूलणाऱ्यांचे मानसशास्त्र

नवशक्ती Web Desk

- डॉ. हमीद दाभोलकर

भ्रम-विभ्रम

भोलेबाबाच्या पाया पडले की वेगवेगळे आजार बरे होतात, या अंधविश्वासापायी झालेली गर्दी आणि त्यातून झालेली चेंगराचेंगरी, ही उत्तर प्रदेशात हाथरल येथे झालेली दुर्घटना ताजी आहे. चमत्कारांवरील अंधविश्वासाच्या अशा अनेक घटना आजूबाजूला सातत्याने घडत असतात. एक झाली का दुसरी, अशी जणू मालिकाच सुरु असते. हे फक्त गावांमध्ये, अशिक्षित व्यक्तींबाबतच घडते असे नाही, तर शहरी, सुशिक्षित लोकंही या अशा चमत्कारांवर विश्वास ठेवत असतात. यात त्यांची फसवणूकही होत असते.पण तरी संकटाच्या समयी चमत्कार घडावा, असे अनेकांना वाटत राहते. यामागचे मानसशास्त्र समजून घेणे, मानवी मेंदू कशाप्रकारे कार्य करतो, हे समजून घेणे गरजेचे आहे. तरच या अशा व्यक्तींसाठी मदतीचा हात पुढे करता येईल.

माझा एक उच्चविद्याविभूषित आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठ्या पदावर काम करणारा मित्र आहे. तो लहानपणापासून अभ्यासू आणि विज्ञानवादी विचारसरणीचा आहे. खूप वर्षांनी मला तो भेटला, तेव्हा त्याने मला स्वत:ची एक गोष्ट सांगितली. काही वर्षांपूर्वी त्याच्या लहान मुलाला कर्करोग झाल्याचे निदान झाले. कसलाही त्रास नसताना अगदी अचानक हे घडले. मित्र मुळात विज्ञानवादी असल्यामुळे त्याने मुलावर सर्वोत्तम असे आधुनिक शास्त्रीय उपचार केले. मात्र हे सांगतानाच त्याने असेही सांगितले की, मुलाचा कर्करोग बरा व्हावा म्हणून आधुनिक वैद्यकीय उपचारांच्या बरोबरीनेच मित्र-मैत्रिणींनी सुचवलेले इतर विविध उपचारही त्याने केले. मंत्र म्हटले, गंडे-दोरे बांधले. नैनितालजवळ एक बाबा आहेत. कोणाच्या तरी सांगण्यावरुन त्यांना देखील तो भेटून आला. काही करून एखादा चमत्कार व्हावा आणि आपला मुलगा बरा व्हावा, यापलिकडे आपल्याला त्यावेळी दुसरे काहीही सुचत नव्हते, असेही त्याने सांगितले. आपल्या त्यावेळच्या व्याकूळ मन:स्थितीविषयी सांगताना तो पुढे म्हणाला की, ‘आज माझा मुलगा आधुनिक वैद्यकीय उपचारांनीच बरा झाला आहे. पण मागे वळून पहाताना मला आश्चर्य वाटते की, मी इतका विज्ञानवादी असून देखील त्यावेळी काही चमत्कार होईल आणि आपला मुलगा बरा होईल ह्या विचारामध्ये मी कसा काय वाहून गेलो?’

लोक चमत्कारांना का बळी पडतात, यामागच्या मानसशास्त्राचा विचार करताना माझ्या या मित्राचे उदाहरण समजून घेण्यासारखे आहे. ते समजून घेण्यासाठी आपल्याला आधी माणसाच्या मेंदूविषयी काही गोष्टी माहीत असणे आवश्यक आहे.

माणसाच्या मेंदूमध्ये एक भावनांचा मेंदू असतो ज्याला ‘लिम्बिक कॉर्टेक्स’ म्हणतात. ढोबळ मानाने मेंदुंचा हा भाग हा प्राण्यांच्या मेंदूच्या जवळ जाणारा असतो. उत्क्रांतीमध्ये ह्याच्या वरती निर्माण झालेल्या ‘निओ कॉर्टेक्स’ या भागाला विचारांचा मेंदू असे म्हटले जाते. जेव्हा मानवी मन ताण-तणावाने ग्रस्त असते तेव्हा या विचारांच्या मेंदूवर जणू एक ‘काळी सावली’ पडल्यासारखी परिस्थिती निर्माण होते. उदाहरणार्थ, खूप सूचना एकाच वेळी दिल्यावर मोबाईल जसा हँग होतो तसेच विचारांच्या मेंदूचे देखील होते. चमत्कारांच्या दाव्याला बळी पडणाऱ्या बहुतांश लोकांमध्ये मेंदूचा विचार करणारा हा भाग हँग झालेला असतो किंवा भावनिक मेंदूकडून हायजॅक झालेला असतो. पाहताना आपल्याला समोर एक विचारी, विज्ञानवादी व्यक्तिमत्त्वाचा माणूस दिसतो, पण त्याचा मेंदू मात्र फक्त भावनेच्या पातळीवर काम करत असतो. ह्या भावनिक मेंदूच्या राज्यात ‘कार्यकारणभाव’ किंवा ‘पुरावा तितका विश्वास’ हे नियम फारसे चालत नाहीत. चमत्कारावर विश्वास ठेवणाऱ्या बहुतांश लोकांच्या बाबतीत हेच घडत असते. वरच्या उदाहरणातील माझ्या मित्राच्या बाबतीत देखील हेच झाले होते. आयुष्यात टोकाच्या ताणतणावांना सामोरे जायची वेळ आली त्यावेळी त्याचे वर्तन असे झाले. स्वत:च्या मुलाच्या मृत्यूची भीती ही मानसिक ताणतणावाच्या बाबतीत अत्यंत टोकाचा ताण निर्माण करणारी असते. अशा परिस्थितीत काही चमत्कार घडावा आणि आपले मुल वाचावे, अशी भावना मनात निर्माण होणे आणि त्यामधून अनेक वर्षे विज्ञानवादी विचार करण्याची सवय असलेला मेंदूही काम करेनासा होणे, ही परिस्थिती निर्माण होते. हे समजून घेणे आवश्यक आहे. ज्यांच्या मनाला विज्ञानवादी विचार करण्याची अनेक वर्षांची सवय आहे त्यांच्या बाबतीत जर हे घडू शकत असेल तर इतर लोकांच्या बाबतीत हे घडते यात नवल ते कोणते!

मानवी मनाकडे एक खूप मोठी क्षमता आहे. त्याला कल्पनाविलास करता येण्याची क्षमता किंवा ‘फँटसी थिंकिंग’ असे म्हणतात. बहुतांश साहित्य आणि कलांचा जन्म हा फँटसी थिंकिंगमधून होत असतो. ह्या स्वरूपाच्या विचारप्रक्रियेमध्ये कार्यकारणभावाला फारसा थारा नसतो. ह्या फँटसी थिंकिंगचा जसा कलानिर्मितीसाठी फायदा होतो तसेच मानवी मन हे टोकाच्या तणावाच्या वेळी देखील दु:खद वास्तवापासून दूर पळण्यासाठी ह्या फँटसी थिंकिंगचा आधार घेते. चमत्काराच्या दाव्यांना बळी पडणाऱ्या मानसिकतेमध्ये फँटसी थिंकिंगचा मोठा वाटा असतो.

मानसशास्त्रामध्ये आणखी एक महत्त्वाची कल्पना आहे, ज्याला व्यक्तिमत्त्वाचा ‘भावनिक ताबा बिंदू’ (Locus of control) असे म्हणतात. जगभरात वेगवेगळ्या देशात जे अभ्यास झाले त्यातून ही संकल्पना मानसशास्त्रात आली आहे. ह्यानुसार मानवी व्यक्तिमत्त्वांची प्रामुख्याने दोन प्रकारे विभागणी केली जाते. ज्या लोकांमध्ये त्यांच्या भावनेचा ताबा बिंदू हा त्यांच्या स्वत:च्या ताब्यात असतो, हा एक प्रकार. अशा स्वरूपाचे व्यक्तिमत्त्व असलेल्या व्यक्ती ह्या साधारणपणे भूलथापांना बळी पडण्याची शक्यता कमी असते. व्यक्तिमत्त्वाचा दुसरा प्रकार म्हणजे ज्यांचा भावनिक ताबा बिंदू हा बाह्य गोष्टींच्या अधीन असतो अशा स्वरूपाचे लोक. हे लोक आपल्या आयुष्यात घडणाऱ्या गोष्टींबाबत बाह्य कारणांवर विश्वास ठेवण्याची शक्यता अधिक असते. एखाद्या चमत्काराच्या माध्यमातून एखादी असाध्य गोष्ट साध्य होऊ शकते अशा विचारांना ही मंडळी बळी पडू शकतात.

चमत्काराच्या दाव्याला बळी पडण्यामागचे आणखी एक महत्त्वाचे कारण म्हणजे व्यक्तिमत्त्व दोष हे होय. मानसिक आजारांमध्ये असे काही व्यक्तिमत्त्व दोष असतात ज्यामध्ये त्या व्यक्तिमत्त्वाच्या माणसांचा जादुई वाटणाऱ्या विचारांवर (magical thinking) लगेच विश्वास बसतो. या स्वरुपाच्या व्यक्तिमत्त्व दोषाला ‘स्किझोटायपल’ असे म्हणतात. स्किझोफ्रेनिया या आजारामध्ये ह्याची तीव्रता अधिक दिसून येते. म्हणजे स्किझोफ्रेनिया असणाऱ्या व्यक्तींना प्रत्यक्षात भास आणि भ्रम होत असतात. पण ‘स्किझोटायपल’ ह्या व्यक्तिमत्त्व दोषामध्ये मात्र असे अनुभव नेहमीच्या जगण्याचा भाग म्हणून येत असतात. अशा लोकांचा चमत्कारांच्या दाव्यावर विश्वास बसण्याची शक्यता खूप मोठी असते.

स्वत:च्या स्वार्थाच्या बाबतीत अत्यंत सजग असलेला माणूस हा ‘पैशाचा पाऊस पडणे’ किंवा ‘चमत्काराने मूल होणे’ अशा स्वरुपाच्या दाव्यांना कसा बरे बळी पडत असेल, असा प्रश्न नेहमी पडतो. ह्यामागचे वैज्ञानिक सत्य आपण समजून घेतले पाहिजे. अर्थकारणाविषयी मानसशास्त्राच्या अंगाने होणारे आधुनिक संशोधन असे दाखवून देते की, सकृत दर्शनी आपण घेतलेले अनेक निर्णय हे स्वहिताची जपणूक करणारे वाटतात, पण प्रत्यक्षात असे अनेक निर्णय हे आपली स्व:ताचीच हुशारीने फसवणूक करणारे असतात. पैशाच्या पावसासारख्या गोष्टींबाबत पैशाच्या लोभातून जेव्हा हे घडते तेव्हा ते समजून घेणे थोडे सोपे असते. इतर वेळी जेव्हा अशा दाव्यांवर लोक विश्वास ठेवतात तेव्हा त्यांचे ढळलेले मानसिक संतुलन तात्पुरते सांधण्यासाठी ह्या चमत्कारावर विश्वास ठेवण्याच्या भावनेचा त्यांना आधार वाटत असतो. त्यामध्ये जरी थेट शोषण होत असले तरी विचारांचा मेंदू हा हँग झाला असल्यामुळे ते मानवी मनाला सहजासहजी समजत नाही.

ह्या पार्श्वभूमीवर डॉ. नरेंद्र दाभोलकर ह्यांचे, ‘अंधश्रद्धा निर्मुलनाला क्रोधापेक्षा करुणेची आणि उपहासापेक्षा आपुलकीची गरज आहे.’, हे वाक्य खूपच महत्त्वाचे ठरते. चमत्काराच्या दाव्याला बळी पडणाऱ्या व्यक्तीची मानसिक अवस्था समजून घेऊन त्यानुसार त्याला मदत करायला शिकणे, हे मानस मित्र/मैत्रीण म्हणून आपले सर्वांचे महत्त्वाचे उद्दिष्ट असले पाहिजे.

(लेखक मनोविकारतज्ज्ञ असून महाराष्ट्र अनिस आणि परिवर्तन या संस्थांशी जोडलेले आहेत.)

राज्यात 'महिला राज'ची चर्चा; सुप्रिया सुळे, रश्मी ठाकरे यांची नावे मुख्यमंत्रीपदासाठी चर्चेत

मुरबाडच्या जागेवर शिवसेना ठाकरे गटाचाही दावा; महाविकास आघाडीत रस्सीखेच वाढणार!

हिरे क्षेत्र गंभीर संकटात; गेल्या तीन वर्षांत आयात-निर्यातीत मोठी घट,'जीटीआरआय’चा दावा

नव्या सरकारच्या स्वागतासाठी मंत्रालयात स्वच्छता मोहीम

‘मला काहीतरी सांगायचंय’; मुख्यमंत्र्यांच्या जीवनावरील नाटक, लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला