दुबई : आशिया चषक टी-२० क्रिकेट स्पर्धेच्या जेतेपदाचा चषक भारताला देण्यावरून सुरू असलेला राडा अद्याप कायम आहे. बुधवारी आशियाई क्रिकेट परिषदेचे (एसीसी) अध्यक्ष मोहसीन नक्वी यांनी भारताने दुबई येथील एसीसीच्या कार्यालयात येऊन आपल्या हस्ते चषक स्वीकारावा, असे मत व्यक्त केले. त्याशिवाय आपण बीसीसीआयच्या कोणत्याही पदाधिकाऱ्याची अद्याप माफी मागितलेली नाही, असेही त्यांनी सांगितले.
सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात खेळणाऱ्या भारतीय संघाने रविवारी आशिया चषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत पाकिस्तानला ५ गडी व २ चेंडू राखून पराभूत केले. भारताने एकंदर नवव्यांदा ही स्पर्धा जिंकली. मात्र भारताच्या विजयापेक्षा त्यानंतर झालेल्या नाट्यमय घडामोडींची सगळीकडे अधिक चर्चा सुरू आहे. भारताने स्पर्धा जिंकल्यानंतर नक्वी यांच्याकडून चषक स्वीकारण्यास मनाई केली. नक्वी हे पाकिस्तानचे मंत्री असून तेच पाकिस्तान क्रिकेट मंडळाचे (पीसीबी) अध्यक्षही आहेत.
संपूर्ण स्पर्धेत भारताने पाकिस्तानच्या खेळाडूंशी हस्तांदोलन करणे टाळले. त्याचप्रमाणे पाकिस्तानी मंत्र्यांच्या हातून चषकही स्वीकारला नाही. नक्वी बराच काळ मंचावर ताटकळत होते. त्यावेळी पाकिस्तानचा संघही मैदानात नव्हता, तर भारताचे खेळाडू मात्र मैदानातच बसून होते. अखेरीस एका तासाने पारितोषिक वितरण सोहळा सुरू झाला. भारताने वैयक्तिक पुरस्कार अन्य पदाधिकाऱ्यांच्या हातून घेतली. मात्र जेतेपदाचा चषक आपणच देणार, यावर नक्वी ठाम होते. शेवटी नक्वी अन्य कुणाच्या हातून भारताला चषक देण्यास तयार झाले नाही व ते चषक घेऊनच माघारी परतले. त्यामुळे भारताने स्वत:च चषकाच्या आभासी प्रतिकृतीसह जल्लोष केला. भारताच्या या कृत्यावर सगळीकडून कौतुक करण्यात येत आहे, तर पाकिस्तानला ट्रोल केले जात आहे.