हिलीचा विजयासह अलविदा ; ऑस्ट्रेलियाकडून भारताचा धुव्वा; एकमेव कसोटी सामन्यात कांगारूंचे भारतीय महिलांवर १० गडी राखून वर्चस्व Photo : X
क्रीडा

हिलीचा विजयासह अलविदा ; ऑस्ट्रेलियाकडून भारताचा धुव्वा; एकमेव कसोटी सामन्यात कांगारूंचे भारतीय महिलांवर १० गडी राखून वर्चस्व

प्रतिभावान अष्टपैलू ॲनाबेल सदरलँडने पहिल्या डावातील शतकानंतर दुसऱ्या डावात गोलंदाजीतही छाप पाडली. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने गुलाबी चेंडूने खेळवण्यात आलेल्या एकमेव कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतीय महिला संघाला १० गडी राखून धूळ चारली. याबरोबरच कर्णधार एलिसा हिलीला ऑस्ट्रेलियन संघाने विजयी निरोप दिला.

Swapnil S

पर्थ : प्रतिभावान अष्टपैलू ॲनाबेल सदरलँडने पहिल्या डावातील शतकानंतर दुसऱ्या डावात गोलंदाजीतही छाप पाडली. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने गुलाबी चेंडूने खेळवण्यात आलेल्या एकमेव कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतीय महिला संघाला १० गडी राखून धूळ चारली. याबरोबरच कर्णधार एलिसा हिलीला ऑस्ट्रेलियन संघाने विजयी निरोप दिला.

पर्थ येथे झालेल्या या प्रकाशझोतातील कसोटीत ऑस्ट्रेलियाने रविवारी तिसऱ्या दिवशीच २५ धावांचे लक्ष्य ४.३ षटकांत सहजपणे गाठले. जॉर्जिया वॉलने नाबाद १६, तर फीबी लिचफील्डने नाबाद ११ धावा केल्या. भारताला पहिल्या डावात १९८ धावांत गुंडाळल्यावर ऑस्ट्रेलियाने ३२३ धावांपर्यंत मजल मारली होती. सदरलँडने १७१ चेंडूंत १२९ धावा केल्या. तसेच एलिस पेरीने (७६) अर्धशतक साकारले.

मग दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाने भारतीय संघ १४९ धावांतच गारद केला. प्रतिका रावलने (६३) अर्धशतकी झुंज दिली. लुसी हॅमिल्टनने ३, तर सदरलँडने २ बळी मिळवले. पहिल्या डावातील १२५ धावांच्या आघाडीमुळे ऑस्ट्रेलियापुढे विजयासाठी अवघे २५ धावांचे लक्ष्य उभे ठाकले. मग वॉल व लिचफील्ड यांनी सहज ते गाठून कांगारूंच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. सदरलँडला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. तसेच तिन्ही मालिकांत मिळून १२९ धावा करण्यासह ६ बळी मिळवल्याने सदरलँडलाच मालिकावीर पुरस्कारही देण्यात आला.

३५ वर्षीय हिलीला दुसऱ्या डावात फलंदाजी करण्याची संधी लाभली नाही. तिने काही दिवसांपूर्वीच एकदिवसीय कारकीर्दीचा शतकाद्वारे शेवट केला होता. या कसोटीच्या पहिल्या डावात हिली १३ धावांवर बाद झाली. क्रिकेटपटू मिचेल स्टार्कची पत्नी असलेल्या हिलीने ११ कसोटी, १२६ एकदिवसीय व १६२ टी-२० सामन्यांत ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधित्व केले.

दरम्यान, भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याचा शेवट झाला आहे. दौऱ्यातील टी-२० मालिकेत भारताने २-१ असे यश संपादन केले. मात्र एकदिवसीय मालिकेत ऑस्ट्रेलियाने भारताला ३-० अशी धूळ चारली. आता कसोटी जिंकून ऑस्ट्रेलियाने चषकही पटकावला. हरमनप्रीत कौरच्या भारतीय संघाने मात्र निराशा केली.

सिलिंडर तुटवड्याचा सुवर्ण व्यवसायाला फटका; जळगावात दागिने तयार करण्याचे काम ठप्प

सत्ताधारी लोकप्रतिनिधींना भरभरून निधी; ३ वर्षांत दीड हजार कोटींच्या निधीचे वाटप; विरोधकांना मात्र ठेंगा

टीएमटी जाळणार ४ कोटी ६३ लाख तिकिटांसह पास; कळवा-वागळे आगारातील साठा हटवण्याचा निर्णय

मुंबईकरांवर पाणीसंकट? पाण्याचे होत आहे वेगाने बाष्पीभवन; धरणांतील पाणीसाठ्यात निम्म्याहून अधिक घट

मुंबईतील बिहार भवनासाठी निविदा जारी; २४० कोटी रुपये अंदाजित खर्च