क्रीडा

सोलापूरच्या अर्शीनचे शतक; भारताचा सलग तिसरा विजय

भारताने युवा विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत अमेरिकेचा २०१ धावांनी फडशा पाडून सलग तिसऱ्या विजयाची नोंद केली.

Swapnil S

ब्लोमफोंटेन : सोलापूरच्या १८ वर्षीय अर्शीन कुलकर्णीने ११८ चेंडूंत १०८ धावांची खेळी साकारली. त्यामुळे भारताने युवा विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत अमेरिकेचा २०१ धावांनी फडशा पाडून सलग तिसऱ्या विजयाची नोंद केली. याबरोबरच भारताने अ-गटात अग्रस्थान मिळवून थाटात ‘सुपर-सिक्स’ फेरी गाठली. आता मंगळवारी त्यांची न्यूझीलंडशी गाठ पडेल.

गतविजेत्या भारताने गटातील अखेरच्या साखळी सामन्यात प्रथम फलंदाजी करताना ५० षटकांत ५ बाद ३२६ धावांचा डोंगर उभारला. पहिल्या दोन सामन्यांत अपयशी ठरलेल्या सलामीवीर अर्शीनने यावेळी आपले कौशल्य दाखवताना ८ चौकार व ३ षटकारांसह शतक झळकावले. त्याला मुंबईकर मुशीर खानच्या (७३) अर्धशतकाची उत्तम साथ लाभली. तसेच कर्णधार उदय सहारन (३५) व प्रियांशू मोलिया (नाबाद २७) यांनीही मोलाचे योगदान दिले. त्यामुळे भारताने ३०० धावांचा पल्ला गाठला.

लक्ष्याचा पाठलाग करताना अमेरिकेला ५० षटकांत ८ बाद १२५ धावाच करता आल्या. उत्कर्ष श्रीवास्तवने त्यांच्याकडून सर्वाधिक ४० धावा केल्या. डावखुरा वेगवान गोलंदाज नमन तिवारीने चार बळी मिळवले. भारताने पहिल्या दोन सामन्यांत अनुक्रमे बांगलादेश व आयर्लंडला नामोहरम केले होते.

सुपर-सिक्सचे गणित

  • आता ‘सुपर-सिक्स’ फेरीत भारताची न्यूझीलंडनंतर २ फेब्रुवारीला नेपाळशी गाठ पडेल. या फेरीत साखळी लढतींच्या विजयांचे गुणही ग्राह्य धरले जाणार आहेत.

  • सुपर-सिक्स फेरीच्या अखेरीस दोन्ही गटांतून आघाडीचे दोन संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील. भारत-पाकिस्तान हे आपापल्या अ व ड गटात अग्रस्थानी होते. त्यामुळे ते सुपर-सिक्समध्ये एकाच गटात असूनही आमनेसामने येणार नाहीत.

  • दुसऱ्या गटात ऑस्ट्रेलिया, श्रीलंका, वेस्ट इंडिजा, दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, झिम्बाब्वे यांचा समावेश आहे.

राज्यभरात पुढील ४ दिवस पावसाचे; अरबी समुद्रात पुन्हा कमी दाबाचा पट्टा

नेपाळमध्ये काय घडतेय ते बघा! सरन्यायाधीश भूषण गवई यांची टिप्पणी

डोनाल्ड ट्रम्प नरमले; भारताशी व्यापार करण्याची तयारी; मोदींनीही दिला प्रतिसाद

फ्रान्समध्येही हिंसाचाराचा उद्रेक! 'ब्लॉक एव्हरीथिंग' आंदोलनात जाळपोळीचे प्रकार; ३०० हून अधिक जणांना अटक; ८०,००० पोलीस तैनात

नेपाळवर लष्कराचे नियंत्रण; देशभरात संचारबंदी लागू ; ३० ठार, १०३३ जखमी