भारतीय क्रिकेट संघाचा हुकमी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह पाठीच्या दुखापतीमुळे अखेर आगामी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतून बाहेर झाला आहे. बुमराहच्या जागी हर्षित राणाची वर्णी लागली आहे. मात्र, बुमराह पूर्ण फिट नसला तरी त्याला चॅम्पियन्स ट्रॉफीच्या संघात ठेवले जाईल आणि स्पर्धेतील अखेरच्या काही सामन्यांपर्यंत पूर्ण फिट झाल्यावर त्याला खेळवले जाईल असे यापूर्वी सांगितले जात होते. त्यानुसार, फिट नसतानाही बीसीसीआयने आयसीसीला सुरूवातीला पाठवलेल्या संघात त्याचा समावेश केला होता. तथापि, संघात बदल करण्यासाठीच्या अखेरच्या दिवशी काही तास शिल्लक असताना, (मंगळवारी, रात्री उशीरा) बुमराह या स्पर्धेत सहभागी होणार नसल्याचे बीसीसीआयने जाहीर केले. तथापि, पीटीआय या वृत्तसंस्थेच्या एका रिपोर्टनुसार एनसीएने बुमराहला फिट घोषित केले होते, पण मग असे काय कारण होते की बुमराहचा समावेश करण्यात आला नाही. बुमराहबाबत अंतिम निर्णय मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांनी घेतला असल्याचेही रिपोर्टमध्ये म्हटले आहे.
"दुखापतीनंतर बुमराहला NCA मध्ये ५-६ आठवडे घालवण्यास सांगितले होते. या कालावधीत त्याच्यासोबत स्ट्रेंथ अँड कंडिशनिंग ट्रेनर रजनीकांत आणि फिजिओ तुलसीही होते. हा कालावधी बुमराहने व्यवस्थित पूर्ण केला. त्याचे स्कॅनचे रिपोर्ट्स, मेडिकल रिपोर्ट देखील ठिक होते. पण त्याची मॅच फिटनेस झालेली नाही, त्यामुळे तो बॉलिंग करण्या इतपत फिट आहे की नाही हे सांगू शकत नाही", असे एनसीए प्रमुख नितीन पटेल यांनी पाठवलेल्या रिपोर्टमध्ये म्हटले होते. "म्हणून निवडकर्त्यांनी धोका पत्करला नाही आणि नितीन पटेल यांनी बुमराहबाबतचा निर्णय पूर्णपणे आगरकर यांच्यावर सोपवला होता", असे बीसीसीआयच्या एका उच्चपदस्थ सूत्राने नाव न छापण्याच्या अटीवर पीटीआयला सांगितले.
"वैद्यकीय पथकाने पूर्ण ग्रीन सिग्नल दिलेला नसताना निवड समिती इतका मोठा धोका कसा पत्करणार? निवड समितीचे अध्यक्ष आगरकर, मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि कर्णधार रोहित शर्मा यांच्यात अहमदाबादमध्ये झालेल्या बैठकीतही नंतर यावर चर्चा झाली होती", असेही या अधिकाऱ्याने सांगितले. यापूर्वी नितीन पटेल यांच्या नेतृत्वाखालील NCA ने 2022 मध्ये घाईघाईने बुमराहचा T20 विश्वचषकापूर्वी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या द्विपक्षीय मालिकेसाठी संघात समावेश केला होता, परंतु तेथे बुमराहला पुन्हा दुखापत झाली आणि त्याला एका वर्षासाठी संघाबाहेर राहावे लागले, त्यामुळे कोणीही जोखिम पत्करण्यास तयार नव्हते. त्यावेळी चेतन शर्मा यांची समिती होती त्यामुळे यावेळी आगरकरांनी कोणताही धोका पत्करला नाही.
चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघ- रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), ऋषभ पंत (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, अर्शदीप सिंग, मोहम्मद शमी, रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, हर्षित राणा.
नॉन ट्रॅव्हलिंग रिझर्व्ह : यशस्वी जैस्वाल, मोहम्मद सिराज आणि शिवम दुबे