दाम्बुला : हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय महिला संघाने आशिया चषक टी-२० क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीतील प्रवेश पक्का केला आहे. त्यामुळे मंगळवारी नेपाळविरुद्ध होणाऱ्या अ-गटातील साखळी लढतीत विजय मिळवून अग्रस्थान टिकवण्याचे भारताचे लक्ष्य असेल.
बांगलादेशमध्ये ३ ते २० ऑक्टोबरदरम्यान महिलांचा टी-२० विश्वचषक खेळवण्यात येणार आहे. त्या स्पर्धेच्या निमित्ताने आशिया चषकाचे महत्त्व वाढले आहे. गेल्या चार हंगांमांपासून टी-२० प्रकारात आशिया चषक खेळवण्यात येत आहे. २०२२मध्ये झालेल्या आशिया चषकात भारतीय संघाने श्रीलंकेला धूळ चारून सातव्यांदा जेतेपद मिळवले होते. आतापर्यंत ४ वेळा एकदिवसीय, तर ४ वेळा टी-२० प्रकारात महिलांची ही स्पर्धा खेळवण्यात आली आहे. त्यापैकी फक्त २०१८मध्येच भारताला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. अन्यथा प्रत्येक वेळी भारतानेच बाजी मारली आहे.
भारताने पहिल्या लढतीत पाकिस्तानचा ७ गडी राखून पराभव केला, तर दुसऱ्या सामन्यात संयुक्त अरब अमिरातीला ७८ धावांनी धूळ चारली. त्यामुळे भारतीय संघ ३.३८६ अशा दमदार नेट रनरेटसह अ-गटात अग्रस्थानी आहे. पाकिस्तान या गटात दोन गुणांसह दुसऱ्या स्थानी आहे. मात्र भारतीय संघ पराभूत झाला आणि पाकिस्तानने अखेरची लढत १००हून अधिक धावांच्या फरकाने जिंकली तरच त्यांना अग्रस्थान पटकावता येईल. त्यामुळे भारतीय संघ अग्रस्थानासह उपांत्य फेरी गाठण्याची दाट शक्यता आहे. दुसरीकडे नेपाळला गेल्या सामन्यात पाकिस्तानकडून पराभव पत्करावा लागला. त्यामुळे त्यांना आगेकूच करण्यासाठी भारताला मोठ्या फरकाने नमवणे अनिवार्य आहे.
दरम्यान, १९ ते २८ जुलैदरम्यान ८ संघांत होणाऱ्या या स्पर्धेत प्रत्येकी ४ संघांचे दोन गट करण्यात आले आहे. भारताच्या गटात पाकिस्तानसह नेपाळ आणि संयुक्त अरब अमिराती (यूएई) यांचा समावेश आहे. अन्य गटात श्रीलंका, बांगलादेश, थायलंड व मलेशिया हे संघ आहेत. २६ जुलै रोजी उपांत्य फेरीचे सामने होतील, तर २८ तारखेला अंतिम सामना खेळवण्यात येईल.
दरम्यान, ब-गटात श्रीलंका सध्या ४ गुणांसह अग्रस्थानी आहे. त्यानंतर थायलंड व बांगलादेश प्रत्येकी २ गुणांसह अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकावर आहे. भारतीय संघाने अग्रस्थान मिळवल्यास त्यांची उपांत्य फेरीत ब-गटातील दुसऱ्या क्रमांकावरील संघाशी गाठ पडेल.
रिचा, स्मृती लयीत; जायबंदी श्रेयांका स्पर्धेबाहेर
भारतीय फलंदाजांची भिस्त प्रामुख्याने डावखुरी स्मृती मानधना आणि रिचा घोष यांच्यावर असेल. तसेच हरमनप्रीतलाही सूर गवसला आहे. शफाली वर्मा, दीप्ती शर्मा, जेमिमा रॉड्रिग्ज अशी फलंदाजी भारताच्या ताफ्यात आहे. गोलंदाजीत पूजा वस्त्रकार लयीत असल्याने ती व रेणुका सिंग वेगवान माऱ्याची धुरा वाहेल. आशा शोबना, राधा यादव, तनुजा कन्वर यांचे फिरकी त्रिकुटही भारताकडे उपलब्ध आहे. श्रेयांका पाटील दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर गेल्याने तनुजाला संघात स्थान देण्यात आले आहे.
भारताचा संघ
हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना, शफाली वर्मा, जेमिमा रॉड्रिग्ज, दीप्ती शर्मा, रिचा घोष, उमा छेत्री, पूजा वस्त्रकार, अरुंधती रेड्डी, रेणुका सिंग, दयालन हेमलता, आशा शोबना, राधा यादव, तनुजा कन्वर, सजीवन सजना.
राखीव खेळाडू : श्वेता सेहरावत, साईका इशाक, मेघना सिंग.
वेळ : सायंकाळी ७ वाजल्यापासून
थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स ३ वाहिनी आणि हॉटस्टार ॲप