क्रीडा

भारत-पाकिस्तान सामन्यात विक्रमांचा पाऊस; विराटने केल्या सर्वाधिक धावा

आंतराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाकिस्तानविरुद्ध पॉवर प्ले दरम्यान भारताची ही आतापर्यंतची सर्वाधिक मोठी भागीदारी ठरली

वृत्तसंस्था

आशिया चषक क्रिकेट स्पधेत भारत आणि पाकिस्तान यांच्यात रविवारी झालेल्या सुपर-४ च्या सामन्यात भारताचा पराभव झाला; मात्र विक्रमांचा पाऊस पडला. या सामन्यात विराटने पाकिस्तानविरुद्ध सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम केला

या सामन्यात केएल राहुल आणि रोहित शर्मा यांच्यात पहिल्या विकेटसाठी ५४ धावांची झालेली भागीदारी टी-२० आंतराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाकिस्तानविरुद्ध पॉवर प्ले दरम्यान भारताची ही आतापर्यंतची सर्वाधिक मोठी भागीदारी ठरली. यापूर्वीचा विक्रम २०१२मध्ये ४८ धावांचा झाला होता. विराट कोहलीच्या शानदार अर्धशतकाच्या जोरावर केलेल्या सात गडी बाद १८१ धावा ही टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दुसऱ्या क्रमाकांची मोठी धावसंख्या ठरली. टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताचा पाकिस्तानविरुद्धचा सर्वाधिक स्कोअर १९२ धावांचा आहे आणि तो २०१२ मध्ये झाला होता. माजी कर्णधार विराट कोहलीने हाँगकाँग आणि पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात सलग दोन अर्धशतके झळकाविली आहेत. यासह त्याने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ३२ वे अर्धशतक साजरे केले. टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक ३१ अर्धशतक ठोकण्याचा रोहित शर्माचा विक्रम त्याने मागे टाकला. टी-२० आंतराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विराट आणि रोहितनंतर बाबर आझमने २७ अर्धशतके, डेव्हिड वॉर्नरने २३ आणि मार्टिन गुप्टिलने २२ अर्धशतके झळकाविली आहेत. विराटने पाकिस्तानविरुद्ध टी-२० क्रिकेटमधील चौथे अर्धशतक झळकाविले. तो भारताकडून पाकिस्तानविरुद्ध सर्वाधिक अर्धशतक झळकाविणारा फलंदाज ठरला. त्याच्याआधी ॲरॉन फिंच, केन विल्यमसन, केविन पीटरसन आणि मार्टिन गुप्टिल यांनीही पाकिस्तानविरुद्ध टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये चार अर्धशतके झळकाविली. या सामन्यात विराटने पाकिस्तानविरुद्ध सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम केला त्याने ९ टी-२० आंतराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात ४०६ धावा केल्या. कोणत्याही भारतीय फलंदाजाची त्याच्यापेक्षा अव्वल सरासरी नाही. पाकिस्तानविरुद्ध कोहलीची सरासरी ६७.६६ इतकी आहे. दुबईच्या याच मैदानावरच कोहलीने गेल्या वर्षी टी-२० विश्वचषकातही शानदार अर्धशतक झळकाविले होते; मात्र तो सामना टीम इंडियाने गमावला होता. भारताचा कर्णधार रोहित शर्माने पाकिस्तानविरुद्ध १२ धावा पूर्ण करताच तो पुरुष आणि महिला या दोन्हींच्या क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू बनला. रोहितच्या १३५ टी-२० सामन्यांमध्ये ३ हजार ५४८ धावा झाल्या. रोहितपूर्वी हा विक्रम न्यूझीलंडची फलंदाज सुझी बेट्सच्या नावावर होता. आशिया कपमध्ये रोहित शर्माने सर्वाधिक षट्कार मारण्याच्या बाबतीत श्रीलंकेच्या सनथ जयसूर्याला मागे टाकले. रोहितने पाकिस्तानविरुद्धच्या खेळीत दोन षट्कार आणि एक चौकार लगावला. यासह त्याचे आशिया कपमध्ये आतापर्यंत २५ षट्कार झाले.

आशिया कपमध्ये सर्वाधिक षट्कार मारण्याचा विक्रम आफ्रिदीच्या नावावर आहे. त्याने २६ षट्कार लगावले आहेत. जयसूर्याने २३, रैनाने १७ आणि धोनीने १६ षट्कार ठोकले आहेत. मोहम्मद रिझवान आशिया चषकाच्या या हंगामात आतापर्यंत झालेल्या सामन्यांमध्ये तो अव्वल स्थानावर पोहोचला. तीन सामन्यात ९६च्या सरासरीने त्याने १९२ धावा केल्या. कोहली तीन सामन्यात ७७च्या सरासरीने १५४ धावांसह दुसऱ्या स्थानावर आहे. अफगाणिस्तानचा रहमुल्ला गुरबाज ४५च्या सरासरीने १३५ धावांसह तिसऱ्या स्थानावर आहे.

आता जनगणना 'तुमच्या' हातात! देशात पहिल्यांदाच डिजिटल जनगणना; मोबाईलवरच माहिती भरण्याची नवी सुविधा

वसई-विरारमध्ये पाणीटंचाईचा इशारा! ४ एप्रिलपासून आठवडाभर पाणीपुरवठा विस्कळीत; कोणत्या भागात कधी पाणी बंद? जाणून घ्या

पुण्यात अवकाळी पावसाचा कहर! रस्ते जलमय, वाहनं अडकली; Video व्हायरल

मुंबईकरांसाठी खुशखबर! बोरीवली-ठाणे प्रवास फक्त १५ मिनिटांत, बोगद्याच्या कामाला सुरुवात

AAPचा मोठा निर्णय! खासदार राघव चढ्ढा यांना राज्यसभेतील उपनेतेपदावरून हटवले; भाषणावरही बंदी, नेमकं कारण काय?