मुंबई : पुढील महिन्यात होणाऱ्या टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय महिला क्रिकेट संघाच्या तयारीबाबत फारसा खुलासा न करता, उपकर्णधार स्मृती मंधाना हिने मंगळवारी सांगितले की, या १२ देशांच्या स्पर्धेसाठी सर्व खेळाडू उत्तम फॉर्मात आहेत.
महिला टी-२० विश्वचषक स्पर्धा येत्या १२ जूनपासून इंग्लंड आणि वेल्स येथे खेळवली जाणार असून, वनडे विश्वचषक विजेत्या भारताचा पहिला सामना १४ जून रोजी पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध होणार आहे. मुंबईत ‘पी सेफ’ या महिला केअर ब्रँडने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत मनधाना म्हणाली की, “भारतीय महिला संघाचे सराव शिबिर चांगले झाले आहे. आम्ही नेमक्या कोणत्या गोष्टींवर काम केले आहे, याचा कोणताही तपशील मी देणार नाही, कारण आम्ही एका विश्वचषक स्पर्धेसाठी निघालो आहोत. परंतु मी इतकेच म्हणेन की, सर्व मुली खूप चांगल्या फॉर्मात दिसत आहेत. त्यांनी खूप चांगला सराव केला असून त्यामागे प्रचंड मेहनत आहे.”
१५ सदस्यांचा भारतीय संघ बंगळुरू येथील ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’मध्ये सराव शिबिरात सहभागी झाला होता. विश्वचषकापूर्वी यजमान इंग्लंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेसाठी हा संघ २२ मे रोजी इंग्लंडला रवाना होणार आहे. “आम्ही विश्वचषकाची तयारी करत आहोत आणि त्याआधी एका मालिकेसाठी रवाना होणार आहोत. आमची तयारी चांगली सुरू आहे आणि मला आशा आहे की, आम्ही अशीच मेहनत घेत राहू, भारताचे नाव उज्ज्वल करू आणि विश्वचषक मायदेशी परत आणू,” असेही स्मृतीने सांगितले.