क्रीडा

आजपासुन बाद फेरीच्या सामन्यांना प्रारंभ होणार

बालेवाडी, पुणे येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे अल्टिमेट खो-खो स्पर्धा सुरू आहे.

वृत्तसंस्था

अल्टिमेट खो-खो लीगचा पहिला हंगाम आता अंतिम टप्प्यावर पोहोचला आहे. गेल्या १६ दिवसांपासून चाहत्यांनी साखळी लढतींचा थरार अनुभवल्यानंतर शुक्रवार, २ सप्टेंबरपासून बाद फेरीच्या सामन्यांना प्रारंभ होणार आहे. त्यामुळे आता उरलेल्या चार संघांमधून नेमका कोणता संघ पहिल्या पर्वाच्या जेतेपदाचा मान मिळवणार, याची उत्सुकता एव्हाना शिगेला पोहोचली आहे.

बालेवाडी, पुणे येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे अल्टिमेट खो-खो स्पर्धा सुरू आहे. शुक्रवारी दोन सामने होणार असून सर्वप्रथम होणाऱ्या एलिमिनेटरमध्ये तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाचे संघ म्हणजेच तेलुगू योद्धास आणि चेन्नई क्वीक गन्स एकमेकांविरुद्ध उभे ठाकतील. या लढतीत पराभूत होणाऱ्या संघाचे आव्हान संपुष्टात येईल. तर शुक्रवारीच होणाऱ्या क्वालिफायर-१मध्ये साखळीत अग्रस्थान मिळवणाऱ्या गुजरात जायंट्सची दुसऱ्या क्रमांकावरील ओडिशा जगरनॉट्सशी गाठ पडेल. यांच्यातील विजेता संघ थेट अंतिम फेरी गाठेल, तर पराभूत झालेल्या संघाला शनिवारी क्वालिफायर-२मध्ये विजय मिळवून अंतिम फेरीत धडक मारण्याची आणखी एक संधी मिळेल. एलिमिनेटरमधील विजेत्या संघाशी त्यांचा शनिवारी सामना होईल. रविवार, ४ सप्टेंबर रोजी महाअंतिम सामना रंगणार आहे.

दरम्यान, बुधवारी झालेल्या अखेरच्या साखळी सामन्यात गुजरातने राजस्थान वॉरियर्सवर ४७-४२ अशी मात केली. २३ गुणांसह गुजरातने अग्रस्थान पटकावले. त्यानंतर अनुक्रमे ओडिशा (२१), तेलुगू (१९), चेन्नई (१५) यांचा क्रमांक लागतो. मुंबई खिलाडीज आणि राजस्थान या संघांना साखळी फेरीतच गाशा गुंडाळावा लागला.

मुंबईतील धोकादायक चार पादचारी पूल बंद; मस्जिद, माटुंगा स्थानकांवरील वाहतूक रोखणार

Mumbai Modak Mahotsav 2026 : बाप्पाचा आवडता खाऊ मुंबईकरांना घरपोच; उकडीच्या व तळलेल्या मोदकांचा घेता येणार आस्वाद

BRICS Summit 2026 : पहलगाम हल्ल्याचा 'ब्रिक्स'कडून निषेध; 'नवी दिल्ली घोषणापत्र' स्वीकारले

Navi Mumbai : एमपीएससी कर्मचाऱ्यांचे बेमुदत काम बंद

Kolhapur : माधुरी हत्तीणीचे जंगी स्वागत, Video