ठाणे

भिवंडी महापालिकेचा ११७९ कोटींचा अर्थसंकल्प सादर; ७३ लाख ९६ हजार शिल्लक; अर्थसंकल्पाला मोजकेच नगरसेवक उपस्थित

भिवंडी महानगरपालिकेचा ७३ लाख ९६ हजार शिल्लक दर्शविणारा ११७९ कोटी १० लाख ९७ हजार रुपयांचा २०२६-२७ चा अर्थसंकल्प आयुक्त अनमोल सागर यांनी विशेष महासभेत महापौर नारायण चौधरी यांना सादर केला.

Swapnil S

भिवंडी : भिवंडी महानगरपालिकेचा ७३ लाख ९६ हजार शिल्लक दर्शविणारा ११७९ कोटी १० लाख ९७ हजार रुपयांचा २०२६-२७ चा अर्थसंकल्प आयुक्त अनमोल सागर यांनी विशेष महासभेत महापौर नारायण चौधरी यांना सादर केला. या सभेस उपमहापौर तारिक मोमिन, अतिरिक्त आयुक्त विठ्ठल डाके व नयना ससाणे व्यासपीठावर उपस्थित होते. विशेष म्हणजे या सभेस मोजकेच नगरसेवक उपस्थित होते. आयुक्तांनी सविस्तर अर्थसंकल्पाचे वाचन न करता ठळक तरतुदींचा उल्लेख असलेली प्रस्तावना वाचून अवघ्या १५ मिनिटांत सभा तहकूब करण्यात आली. अर्थसंकल्पावर सविस्तर चर्चा करण्यासाठी सोमवार, ३० मार्च रोजी विशेष महासभा आयोजित करण्यात येणार असल्याची घोषणा महापौर नारायण चौधरी यांनी केली.

आयुक्त अनमोल सागर यांनी आपल्या भाषणात सन २०२५-२६ चा १११७ कोटी ५२ लाख ५४ हजार रुपयांचा सुधारित अर्थसंकल्प तसेच सन २०२६-२७ चा ११७९ कोटी १० लाख ९७ हजार रुपयांचा मूळ अर्थसंकल्प मंजुरीसाठी सादर करत असल्याचे स्पष्ट केले. महिला व बालकल्याण, दुर्बल घटक कल्याण आणि दिव्यांग कल्याण या विभागांसाठी महसुली उत्पन्नातून बांधीव खर्च वजा केल्यानंतर उर्वरित रकमेच्या ५ टक्के म्हणजेच ३ कोटी २६ लाख ४० हजार रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

पायाभूत सुविधांसाठी विशेष निधी

  • ए.पी.जे. कलाम शिक्षण अभियान १ कोटी

  • पीएम बस सेवा सुरू करण्यासाठी ५ कोटी

  • जीआय सर्वेक्षण १० कोटी

  • शाळा दुरुस्ती ४ कोटी

  • १०० एमएलटी प्रकल्प २५ कोटी

  • रस्ते रुंदीकरण २ कोटी

पाणीपुरवठा व शिक्षण विभागावर खर्चाचा ताण

पाणीपुरवठा व मलनिस्सारण, शिक्षण आणि वृक्ष संवर्धन विभागांमध्ये उत्पन्नापेक्षा खर्च जास्त असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे पाणीपुरवठ्यासाठी १०५ कोटी १४ लाख ९१ हजार रुपये, शिक्षण विभागासाठी ७६ कोटी ११ लाख २६ हजार रुपयाची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.

३० मार्चला अर्थसंकल्पावर चर्चा

अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर नगरसेवकांना अभ्यासासाठी वेळ मिळावा, तसेच शहर विकासाबाबतच्या संकल्पना मांडता याव्यात, यासाठी किमान चार दिवसांचा अवधी देण्याची मागणी शिवसेना नगरसेवक मनोज काटेकर यांनी केली. यास काँग्रेसचे प्रशांत लाड व भाजपचे सुमित पाटील यांनी पाठिंबा दिला. यानंतर महापौर नारायण चौधरी यांनी सोमवार, ३० मार्च रोजी सकाळी ११ वाजता विशेष महासभा घेऊन अर्थसंकल्पावर सविस्तर चर्चा करण्यात येईल अशी घोषणा करत सदर सभा तहकूब केली.

दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय; कॉकरोच जनता पार्टीचे 'एक्स' अकाउंट पुन्हा सुरू करण्याचे आदेश

Mumbai : धरणक्षेत्रात पाऊसधारा; २४ तासांत पाणीसाठ्यात ३.७३ टक्क्यांनी वाढ

Kasara Ghat Landslide : जुन्या कसारा घाटात दरड कोसळली; मुंबई-नाशिक महामार्गावरील वाहतूक विस्कळीत, Video

उरण : जेएनपीए बंदरात वादळी वाऱ्याचा तडाखा; कंटेनर पडून एका कामगाराचा मृत्यू

मुसळधार पावसानंतर ठाण्यात अस्वच्छतेचे साम्राज्य; झाडांच्या फांद्या अद्याप रस्त्यांवर, नागरिकांकडून तातडीने साफसफाईची मागणी