स्थानिक स्वराज्य संस्था आणि राज्यशासन यांनी आतापर्यंत विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी गंभीरपणे पावले न उचलल्याने आजही विद्यार्थ्यांच्या समस्या कायम आहेत, या दृष्टीने महाराष्ट्र नवनिर्माण सेना विद्यार्थ्यांच्या हितासाठी नेहमीच पुढाकार घेणार असल्याचे पक्षाचे युवा नेते अमित ठाकरे यांनी म्हटले आहे.
उल्हासनगर येथील टाऊन हॉलमध्ये विद्यार्थी मेळावा आयोजित करण्यात आला होता. पत्रकारांशी चर्चा केल्यानंतरच शहरातील नेमक्या काय समस्या आहे ते कळते. त्यामुळे मी पत्रकारांची चर्चा करणे महत्त्वाचे मानतो, यावेळी शहरात परिवहन सेवा नसल्याने महाविद्यालयीन व शालेय विद्यार्थ्यांना बस ऐवजी रिक्षा अथवा खाजगी वाहनाने शाळेत जावे लागते, रिक्षावाले अवाच्या सव्वा भाडे आकारत आहेत. गरीब विद्यार्थी कित्येक किलोमीटरचे अंतर पायी चालत जातात, शासनाने ई-लर्निंग, संगणकद्वारे शिक्षण याचा मोठा गाजावाजा केला आहे, प्रत्यक्षात मात्र विद्यार्थ्यांना पाठीवर अत्यंत वजनदार स्कूलबॅग घेऊन शाळेत जावे लागत आहे. विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी मैदान नसल्यामुळे विद्यार्थ्यांचा अपेक्षाभंग झाल्याचे पत्रकारांनी अमित ठाकरे यांच्या निदर्शनास आणून दिले.