ठाणे : दरवर्षीप्रमाणे यंदा देखील जिल्ह्यातून पंढरपूर येथे आषाढी एकादशीनिमित्त जाणाऱ्या वारकऱ्यांना सेवा देण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची लालपरी सज्ज झाली आहे. यासाठी ठाणे जिल्ह्यातून जादा ६४ बसेसचे नियोजन केले आहे. या बसेसचे ग्रुप आरक्षण आणि तिकीट आरक्षण सुरू झाले आहे. या दिवसात पंढरपूरला जाण्यासाठी बसेसची जशी मागणी होईल तशी व्यवस्था केली जाणार आहे, तर पंढरपूर यात्रेला जाणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसाठी अमृत ज्येष्ठ नागरिक योजना व महिला सन्मान योजना या दोन सवलती जाहीर केल्या आहेत. त्याचा लाभ ज्येष्ठ नागरिक आणि महिलांनी घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
एसटी बसेसचा लाभ घेण्याचे आवाहन
यावर्षी राज्य शासनाकडून प्रवाशांकरिता ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी अमृत ज्येष्ठ नागरिक योजना व महिला सन्मान योजना या दोन सवलती जाहीर केल्यामुळे त्याचा लाभ आषाढी पंढरपूर यात्रेकरिता जाणाऱ्या प्रवाशांना होणार आहे. तरी त्या भाविकांनी आषाढी पंढरपूर यात्रेकरिता एसटी बसेसने प्रवास करून या सवलतींचा लाभ घ्यावा, असे आवाहन ठाणे विभागाकडून करण्यात येत आहे.
२ जुलैपासून जादा गाड्या
६ जुलै रोजी आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे जाणाऱ्या भाविकांकरिता राज्य परिवहन ठाणे विभागाकडून ठाणे बस स्थानक, भिवंडी, कल्याण, विठ्ठलवाडी, डोंबिवली, वाडा, शहापूर, मुरबाड, बोरिवली नॅन्सी कॉलनी येथून २ जुलैपासून जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच ६ ते १३ जुलैपासून चंद्रभागा बसस्थानक, पंढरपूर येथून परतीची वाहतूक सुरू होणार आहे.
आरक्षण व्यवस्था प्रत्येक स्थानकावर उपलब्ध
ठाणे आगार १, ठाणे २, भिवंडी तर कल्याण, मुरबाड, विठ्ठलवाडी, शहापूर आणि वाडा या आगारातून एकूण ६४ जादा गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. सोडण्यात येणाऱ्या सर्व जादा गाड्यांचे आरक्षण एक महिना अगोदर उपलब्ध करू देण्यात आले आहे. परतीचे आणि ग्रुप पद्धतीचे आरक्षण करण्याची व्यवस्था प्रत्येक बसस्थानकावर करण्यात आलेली आहे.