उल्हासनगर : उल्हासनगरच्या कॅम्प नंबर ५ परिसरात गुरुवारी रात्री गोळीबाराच्या थरारक घटनेने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. कैलास कॉलनी चौकात जुन्या वादातून झालेल्या या अंदाधुंद फायरिंगमध्ये तीन जण गंभीर जखमी झाले होते, त्यापैकी दोन जणांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाल्याने संपूर्ण परिसर अक्षरशः दहशतीखाली गेला होता.
उल्हासनगर कॅम्प नंबर ५ येथील कैलास कॉलनी चौकात रात्री उशिरा जुन्या वैमनस्यातून प्राणघातक हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली. काही अज्ञात हल्लेखोरांनी भररस्त्यात अंदाधुंद गोळीबार करत तिघांवर जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात दोन जणांचा मृत्यू झाला. तर एकावर उल्हासनगरच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
गोळीबारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेनंतर आरोपी तेथून फरार झाले. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांच्यासह हिललाईन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी व पोलीस पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.
पोलिसांनी परिसराची नाकेबंदी करत आरोपींचा शोध सुरू केला असून विविध पथके रवाना करण्यात आली आहेत.