ठाणे : ठाणे महानगरपालिकेतील उपायुक्त शंकर पाटोळे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने २५ लाखांची लाच घेताना अटक केल्यानंतर आता राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपांचा भडिमार सुरू झाला आहे. भाजप, शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे गटातील नेत्यांनी या प्रकरणावर जोरदार प्रतिक्रिया दिल्या असून, महापालिकेत लाचखोर अधिकाऱ्यांना प्रोत्साहन दिले जात असल्याचा आरोप केला आहे. तसेच आजी-माजी अधिकाऱ्यांच्या मालमत्तेची चौकशी करण्याची मागणीही करण्यात आली आहे.
शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी महापालिकेतील भ्रष्टाचारावर निशाणा साधला. “लाचखोर अधिकारी प्रमोशन कसे घेतात? दोन वेळा चौकशी झाली, त्याचे काय झाले? शासनातून आलेले अधिकारी ठाण्यात येतात आणि परत जात नाहीत. ठाण्यातलं कोणतं श्रीखंड पुरी एवढं आवडतं का?” असा टोला आव्हाड यांनी लगावला.
ठाण्यातील बेकायदेशीर बांधकामांवरही संताप व्यक्त केला. “येऊरमध्ये बंगल्यांचे बांधकाम सुरू आहे, त्यांचा कर्ता कोण आहे? हायकोर्टाने आदेश दिले तरी बांधकाम सुरूच आहे,” असे ते म्हणाले. दुसरीकडे, भाजपचे आमदार संजय केळकर यांनीही पाटोळे प्रकरणावर सडकून टीका केली. “महापालिकेकडून कुणावर कारवाई होत नाही. ज्या कारवाया झाल्या त्या कोर्टाच्या आदेशाने झाल्या आहेत. अशा घटनांमुळे ठाणेकरांना मान खाली घालावी लागत आहे,” असे केळकर म्हणाले.
काही अधिकारी लुटमार करत आहेत आणि काही जण त्यावर पांघरूण घालत आहेत. काहीजण पालिकेला स्वतःची मालमत्ता समजतात. त्यामुळे अधिकाऱ्यांचा बळ वाढले असून त्यांना भीती राहिलेली नाही,” असा आरोपही त्यांनी केला. काही आजी-माजी अधिकाऱ्यांच्या मालमत्तेची चौकशी ईडी किंवा आयकर विभागाकडून व्हावी, अशी मागणी केळकर यांनी केली.
ठाणेकरांना महापालिकेतील भ्रष्टाचाराचा कंटाळा आला असून, नगरविकास मंत्री ठाण्याचे असतानाही अनाधिकृत बांधकाम वाढत आहे, अशा तक्रारी नागरिकांकडून होत आहेत. एका अधिकाऱ्याला लाच घेतल्याप्रकरणी अटक होते, तर या भ्रष्ट अधिकाऱ्यांचा आका मंत्रिमंडळात आहे का? असेल, तर मुख्यमंत्री त्यावर कारवाई करतील का?केदार दिघे, जिल्हा प्रमुख उद्धव सेना