ठाणे

रमाबाई नगरच्या ४०० कुटुंबांचे घरांचे स्वप्न अखेर पूर्ण! गुंतागुंतीच्या न्यायालयीन लढ्यास लाभले यश

Swapnil S

वसई : वसईतील माता रमाबाई नगर येथील आर्थिक दुर्बल ४०० कुटुंबाचे स्वतःच्या हक्काच्या घरांचे स्वप्न अखेर पूर्ण होत आहे. या कुटुंबांना बेघर करून, हुसकावून लावण्याच्या विकासकाच्या प्रयत्नास न्यायालयीन लढ्याद्वारे हाणून पाडण्यात यश आले आहे. या गरीब कुटुंबांची न्यायालयात भक्कम बाजू मांडणाऱ्या वसईतील सुप्रसिद्ध दिवाणी वकील ॲड. साधना धुरी यांनी न्यायालयाकडून मनाई हुकूम मिळवल्यामुळे विकासक वाटाघाटी करून, सर्वांना मोफत घरे बांधून देण्यास तयार झाला आहे. या गृहनिर्माण प्रकल्पाचे बुधवारी ॲड. साधना धुरी यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले आहे.

२०१२ रोजी वसई कोर्टात तीन दिवाणी दावे दाखल झाले होते. ज्यात माता रमाबाई नगरच्या जागामालक आदित्य डेव्हलपर्सने तिथे वस्ती करून राहत असलेल्या गरीब आणि आर्थिक दुर्बल ४०० कुटुंबांच्या झोपड्या तोडून त्यांना बेघर करून जमिनीचा मोकळा कब्जा मागितला होता. या गरीब लोकांपैकी कित्येकांकडे स्वतःचे रेशन कार्ड देखील नव्हते. श्रीमंत विकासकासोबत न्यायलयीन लढाईसाठी पुरेसा पैसाही नव्हता. अशा प्रतिकूल प्रकरणांत सामाजिक भावनेने पूर्ण लक्ष घालून, त्यांची केस वसईतील सुप्रसिद्ध दिवाणी वकील ॲड. साधना धुरी यांनी निकराने लढली. आमिष, प्रलोभणाला थारा न देता गुणवत्तेच्या जोरावर हा खटला लढला गेला. अखेर या लढ्यास यश मिळून, माता रमाबाई नगरच्या आर्थिक दुर्बल ४०० कुटुंबाना हुसकावून लावण्यापासून केर्टातून मनाई हुकूम मिळवला आहे. त्यामुळे आता जमीनमालक त्यांना घर बांधून देण्यास तयार झाला असून, मालकाशी वाटाघाटी करून वस्तीवाले एक पैसाही न देता त्यांना मोफत घरे मिळतील, या अटीवर समझोता झाला आहे.

स्थानिकांनी व्यक्त केला आनंद

या प्रकल्पात एक १६ मजली इमारत आहे. ज्यात ४०० सेल्फकंटेन्ड प्लॅटस् आणि वस्तीवाल्यांसाठी एक मंदिर असणार आहे. शिवाय एक उद्यान / गार्डन व लहान मुलींसाठी एक बालवाडीची तरतूद असणार आहे. आज त्या प्रकल्पाचे भूमिपूजन या केसेस सुरवातीपासून चालवून वस्तीवाल्यांना मोफत घरे मिळवून देण्यात अग्रणी भूमिका बजावणाऱ्या ॲड. साधना धुरी यांच्या हस्ते करण्यात आले. ॲड. धुरी यांनी वस्तीवाल्यांना दिलेले वचन पूर्ण केल्याबद्दल समाधान व्यक्त करण्यात आले आहे. या सोहळ्यात आदित्य डेव्हलपर्सचे भागीदार बिनल कोरडिया आणि दत्ता नर, माता रमाबाई ट्रस्टचे अध्यक्ष उमेश शेट्टी व इतर पदाधिकार उपस्थित होते.

Mumbai : आर्थिक कोंडी फोडण्यासाठी ‘बेस्ट’ आयडिया! आता CNG विकणार; २७ डेपोंत प्रकल्प राबवणार

कोल्हापूर -पुणे 'वंदे भारत' आजपासून; आठवड्यातून ३ दिवस धावणार, बघा वेळापत्रक

‘लालबागचा राजा’च्या दर्शनासाठी भेदभाव; दोन वकिलांची मुंबई पोलिसांकडे तक्रार

नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवठ्यात निवडणुका; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे संकेत, महायुतीचे जागावाटप आठवडाभरात पूर्ण!

गणरायाच्या विसर्जन सोहळ्यासाठी BMC सज्ज; ६९ नैसर्गिक स्थळांसह, २०४ कृत्रिम विसर्जनस्थळांची व्यवस्था