नवी दिल्ली/कोची : टाटा समूहाच्या मालकीची विमान कंपनी असलेल्या एअर इंडिया एक्स्प्रेसने मंगळवारी रात्रीपासून जवळपास ८० उड्डाणे रद्द केल्याने देशातील विविध विमानतळांवर हजारो प्रवाशांना तिष्ठत राहावे लागले. कंपनीच्या गैरव्यवस्थापनाच्या निषेधार्थ अनेक कर्मचाऱ्यांनी आजारी असल्याचे कारण देत सेवेवर रुजू होण्यास नकार दिल्याचे कळते.
कंपनीच्या गैरव्यवस्थापनाच्या निषेधार्थ २०० हून अधिक कर्मचाऱ्यांनी आजारी असल्याचे कारण देत सेवेत रुजू होण्यास असमर्थता दर्शविली, असे बुधवारी सूत्रांनी सांगितले. कर्मचाऱ्यांच्या अनुपलब्धतेमुळे ८० हून अधिक उड्डाणे रद्द करावी लागली तर काही उड्डाणांना विलंब झाला. कोची, कालिकत, दिल्ली आणि बंगळुरू विमानतळांवर सेवा विस्कळीत झाली होती. कर्मचाऱ्यांनी आजारी असल्याचे कारण का दिले याबाबत त्यांच्याशी चर्चा सुरू आहे. प्रवाशांना झालेल्या त्रासाबद्दल कंपनीच्या प्रवक्त्याने दिलगिरी व्यक्त केली असून, प्रवाशांना त्यांच्या तिकिटाचा पूर्ण परतावा मिळेल, असे नमूद केले.
आखाती देशांमध्ये जाणाऱ्या एअर इंडिया एक्स्प्रेसच्या अनेक प्रवाशांनी केरळमधील विमानतळांवर निषेध नोंदविला. विमानांचे उड्डाण रद्द करण्यात आल्याचे त्यांना ऐनवेळी कळविण्यात आले. सुरक्षा तपासणी झाल्यानंतर उड्डाण रद्द झाल्याचे आम्हाला सांगण्यात आल्याचा दावा काही प्रवाशांनी केला.
नागरी उड्डाण मंत्रालयाने अहवाल मागवला
नागरी उड्डाण मंत्रालयाने एअर इंडिया एक्स्प्रेसकडून उड्डाणे रद्दे झाल्याबद्दलचा अहवाल मागवला आहे. कंपनीला भेडसावणाऱ्या समस्या तत्परतेने सोडवाव्यात आणि ‘डीजीसीए’च्या निकषांप्रमाणे प्रवाशांना सुविधा मिळतील असे पाहावे, अशा सूचनाही मंत्रालयाने दिल्या आहेत.